India vs England Head-to-Head Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत रंगणाऱ्या या मालिकेतून शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीत इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या २०२५-२७ च्या चौथ्या हंगामाला सुरुवात करतील. इथं जाणून घेऊयात भारत-इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डबद्दलची खास माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
७ सामन्यात फक्त २ विजय अन् ४ पराभव! एक सामना राहिलाय अनिर्णित
भारतीय संघाने १९५२ मध्ये विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघाने यै मैदानात ७ सामने खेळले आहेत. त्यात फक्त दोन वेळा टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने चार विजय मिळवले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानातील टीम इंडियाची कामगिरी
सामना क्रमांक | तारीख | निकाल | भारतीय कर्णधार |
---|---|---|---|
१ | ५–९ जून १९५२ | ७ विकेट्सनी पराभव | विजय हजारे |
२ | २–४ जुलै १९५९ | एक डाव व १७३ धावांनी पराभव | दत्ताजीराव गायकवाड |
३ | ८–१३ जून १९६७ | ६ विकेट्सनी पराभव | मन्सूर अली खान पतौडी |
४ | १६–२१ ऑगस्ट १९७९ | अनिर्णित | एस. वेंकटराघवन |
५ | १९–२३ जून १९८६ | भारताचा विजय – २७९ धावांनी | कपिल देव |
६ | २२–२६ ऑगस्ट २००२ | भारताचा विजय – एक डाव व ४६ धावांनी | सौरव गांगुली |
७ | २५–२८ ऑगस्ट २०२१ | एक डाव व ७६ धावांनी पराभव | विराट कोहली |
टीम इंडियानं कुणाच्या नेतृत्वाखाली कधी मिळाला होता विजय?
१९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मैदानात पहिला कसोटी सामना जिंकला होता. टीम इंडियाने हा सामना २८९ धावांनी जिंकला होता. त्यानंतर २००२ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हे मैदान मारलं होते. यावेळी भारतीय संघाने एक डाव आणि ४६ धावांनी सामना आपल्या नावे केला होता. २०२१ मध्ये या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शेवटचा सामना खेळला. ज्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली होती.
भारत-इंग्लंड हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकंदरीत रेकॉर्डवर नजर टाकली तरी इथं इंग्लंडचा बोलबाला दिसून येतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १३६ कसोटी सामने खेळवण्यात आले असून भारतीय संघाने ३५ सामन्यात विजय मिळवला असून इंग्लंडच्या खात्यात ५१ विजयाची नोंद आहे. दोन्ही संघातील ५० सामने अनिर्णित राहिले आहेत.