इंग्लंड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या ३ सामन्यातील २ विजयासह यजमान इंग्लंड संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मँचेस्टरचं मैदान मारत मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. या सामन्याआधी इंग्लंडच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाला खास सल्ला दिला आहे. आमच्यासोबत अर्थात इंग्लंडची बरोबरी साधायची असेल तर खरी ताकद दाखवा, अशा आशयाचे वक्तव्य इंग्लंडच्या दिग्गजाने केले आहे. कोण आहे तो माजी क्रिकेटर अन् टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवताना त्याने काय सल्ला दिलाय? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या माजी दिग्गजाने दिला सल्ला, म्हणाला....
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी भारताला ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरचं मैदान मारण्यासाठी आपली खरी ताकद आजमावण्याचा सल्ला दिला आहे. स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा हा दिग्गज म्हणाला आहे की, मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल ठरेल. या परिस्थितीत भारतीय संघाने डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली पाहिजे. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजासोबत तो संघात असेल तर टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा होईल, असे वाटते.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
लॉर्ड्सच्या मैदानात मोठी संधी हुकली
लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात पहिला सामना गमावल्यावर बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली. लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. पण १९३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फसली. चौथ्या दिवसाअखेर हातात असलेला सामना टीम इंडियाने पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अवघ्या २२ धावांनी गमावला. कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिलेला सल्ला ऐकणार का? ते पाहण्याजोगे असेल.
कुलदीपला एकाही सामन्यात का नाही मिळाली संधी?
कुलदीप यादव हा सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा फिरकीपटू आहे. पण इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या तीन सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याचीच वेळ आली. भारतीय संघ फलंदाजी मजबूत करण्यावर भर देत आपली खरी ताकद असलेल्या फिरकीकडे दुर्लक्ष करताना दिसून आले आहे. जडेजा आणि वॉशिंग्टन यांच्या रुपात संघाकडे फिरकीचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. पण कुलदीप यादव हाच ताकद आजमावण्याचा योग्य पर्याय ठरू शकतो.