भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या मैदानात रंगणार आहे. कमालीचा योगायोग हा की, चौथ्या सामन्याआधी या मैदानात आतापर्यंत ४ आंतरारष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारतीय संघानं पुण्याच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध याआधी एक टी-२० सामना खेळला आहे. एवढचं काय तर हा सामना जिंकलाही आहे. पण या मैदानात जो शेवटचा सामना झाला त्यात मात्र टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. जाणून घेऊयात या मैदानातील टीम इंडियाची कामगिरी अन् खास रेकॉर्ड्स
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फक्त ४ टी-२० सामने अन् फिफ्टी-फिफ्टी सीन
आयपीएल स्पर्धेतील ५० हून अधिक सामन्यांची मेजवानी करणाऱ्या पुण्याच्या मैदानात आतापर्यंत फक्त ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यात दोन वेळा पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघानं बाजी मारलीये तर दोन वेळा दोन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानही सामना जिंकला आहे. हा फिफ्टी फिफ्टी सीन टॉसनंतर काय करावं? यासंदर्भातील निर्णय घेताना दोन्ही संघातील कर्णधारांसाठी संभ्रम निर्माण करणारा आहे.
पुण्याच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातच खेळवण्यात आला होता पहिला टी-२० सामना
२०१२ मध्ये पुण्याच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यात टी-२० सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघानं बाजी मारली होती. या सामन्यात इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १५७ धावा केल्या होत्या. धोनीच्या नेतृत्वाखालील संघानं हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला होता. ऑलराउंडर कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता.
पुण्याच्या मैदानातील अखेरच्या टी-२० सामन्यात काय घडलं?
२०२३ मध्ये भारतीय संघानं पुण्याच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघासमोर श्रीलंकेच्या संघानं २०६ धावा करत तगडे आव्हानं ठेवले होते. हा सामना भारतीय संघानं १६ धावांनी गमावला होता. याआधी श्रीलंकेच्या संघानेच या मैदानात टीम इंडियाला पराभूत केले होते. भारतीय संघानं टी-२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन सामने गमावले असून एक विजय मिळवला आहे.