IND vs ENG 3rd T20I England beats India by 26 runs to keep series alive : 'करो वा मरो' लढतीत इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा विजय रथ रोखतं मालिकेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. या विजयासह इंग्लंडच्या संघानं कमबॅक केल्यामुळे पाच सामन्यांच्या टी-२० मालिका कोण जिंकणार यात नवं ट्विस्ट निर्माण झाले आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियासमोर १७२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना यावेळी भारतीय फलंदाजी फोल ठरली. हार्दिक पांड्यानं ३५ चेंडूत केलेल्या ४० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी भारतीय संघानं विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याची संधी गमावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्माची नॉट आउट इनिंगचा सिलसिला संपला, आघाडीच्या फळीतील एकही फार काळ नाही टिकला
इंग्लंडच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुावत खराब झाली. धावफलकावर १६ धावा असताना सलामीवीर संजू सॅमसन ३ धावा करून तंबूत परतला. जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. अभिषेक शर्मा १४ चेंडूत २४ धावांची खेळी करून परतल्यावर भारतीय संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी कॅप्टन सूर्यकुमार यादव अन् नाबाद खेळीच्या सिलसिला दाखवून देणाऱ्या तिलक वर्माच्या खांद्यावर आली. सूर्यकुमारनं एक षटकार अन् चौकार मारून यावेळी दमदार खेळी करण्याचा इरादा असल्याची झलक दाखवली. पण तो ७ चेंडूत १४ धावा करून माघारी फिरला. मार्क वूडनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अदिल राशीदनं तिलक वर्माला १८ धावांवर बाद केलं अन् इंग्लंडचा संघ या सामन्यात आला.
हार्दिक पांड्यानं आशा पल्लवित केल्या, पण...
आघाडीच्या फलंदाजीत कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था आठव्या षटकातच ४ बाद ६८ अशी बिकट झाली होती. पण भारतीय संघाची बॅटिंग ऑर्डर स्ट्राँग असल्यामुळे इथंनही मॅच निघेल असे वाटत होते. हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीनं आशा पल्लवितही झाल्या. पण तो ४० चेंडूत ३५ धावा करून परतला अन् उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. भारतीय संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १४५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि ब्रायडनला प्रत्येकी २-२ तर मार्क वूड आणि आदिल रशीद याने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
'हार के जीतनेवाला बाजीगर' ठरला वरुण
राजकोटच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना बेन डकेटनं केलेल्या अर्धशतकी खेळीसह लियाम लिविंगस्टोन याने २४ चेंडूत केलेल्या ४३ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १७१ धावा केल्या होत्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक एक विकेट घेतली. मोहम्मद शमीला मात्र कमबॅकमध्ये एकही विकेट हाती लागली नाही. भारतीय संघानं सामना गमावल्यावरही पंजा मारणाऱ्या वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.