Shubman Gill Team India Declaration Video, IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ५८७ धावा केल्या. त्यानंतर सिराजच्या ६ बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४०७ धावांमध्ये तंबूत धाडले आणि १८० धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पण केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली. तर कर्णधार शुबमन गिलने दमदार शतक पूर्ण केले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत भारताने ४८४ धावांची आघाडी मिळवली होती. याचदरम्यान, दुसऱ्या सत्रात एक वेगळाच किस्सा घडला. त्यात शुबमन गिलने जे उत्तर दिले त्याचे कौतुक होत आहे.
हॅरी ब्रूक आणि शुबमन गिल यांचा मजेशीर संवाद
शुबमन गिल आणि ऋषभ पंत दोघेही मैदानात खेळत होते. अप्रतिम फलंदाजी करत भारताची आघाडी ४५० धावांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी हॅरी ब्रूक स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. शुबमन गिल धाव पूर्ण करून बॅटिंग क्रीजजवळ फिरत होता. त्यावेळी हॅरी ब्रूक त्याला म्हणाला, "शुबमन, ४५०ची आघाडी झाली, आता डाव घोषित करून टाक. उद्या पाऊस पडणार आहे. अर्ध्या दिवसाचाच खेळ होऊ शकतो..." त्यावर शुबमन गिलने फारसे लक्ष दिले नाही. तो केवळ म्हणाला, "तसं झालंच तर ते आमचे 'बॅड लक' असेल..." शुबमन गिलचे चित्त विचलित करण्यासाठी हा प्रयत्न होता. पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्यानंतर शतक पूर्ण केले. त्यामुळे त्याच्या उत्तराचे कौतुक केले जात आहे. पाहा व्हिडीओ-
हेही वाचा: बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल... (PHOTOS)
गिलच्या डोक्याला लागला चेंडू
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७ व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. इंग्लंडकडून जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात खेळत होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकनं एक जोरदार फटका खेळला. चेंडू खूपच वेगाने आल्यामुळे शुबमन गिलला चेंडूचा अंदाज घेता आला नाही. झेल पकडण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या डोक्यावर लागला. मग उप कर्णधार रिषभ पंत गिलकडे गेला. शुबमन गिलही डोके चोळताना दिसले. मैदानातील या घटनेनंतर फिजिओही मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. हे दृश्य क्षणभरासाठी टीम इंडियातील ताफ्यातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढवणारे होते. पण सुदैवाने फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे गिलला मोठी दुखापत होण्याचा अनर्थ टळला.