शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला रिषभ पंतच्या खास कामगिरीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. भारतीय मुख्य प्रशिक्षकाला हा प्रश्न चांगलाच खटकल्याचे दिसून आले. पंतचं कौतुक करण्याऐवजी त्याने अन्य खेळाडूंची नावे घेत पत्रकारांची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? रिषभ पंतसंदर्भातील प्रश्नावर नेमकं तो काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीरला खटकला पंतसंदर्भातील प्रश्न? असा दिला रिप्लाय
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं दोन्ही डावांत शतकी खेळीसह नवा इतिहास रचला. त्याच्या या खेळीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर गंभीरनं थेट वक्तव्य न करता अन्य शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले. पंतच्या दोन शतकासंदर्भातील प्रश्नावर गंभीर म्हणाला की, याशिवाय आणखी तीन शतके पाहायला मिळाली. ही देखील सकारात्मक गोष्ट आहे. यशस्वीचं शतक, शुबमन गिलनं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना केलेली शतकी खेळी, केएल राहुलच्या शतकासह रिषभ पंतच्या भात्यातून आलेली दोन शतके .. या पाच शतकांसह भारतीय संघाने चांगली सुरुवात केलीय आहे, असे सांगत गंभीरनं सर्व शतकवीरांचा उल्लेखासह प्रश्न आणखी उत्तम ठरला असता, अशा आशयाचे वक्तव्य केले.
...तर वैयक्तिक कामगिरी काय कामाची
खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी चांगली झाली. आघाडीच्या ६-७ फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते. हेडिंग्लेच्या मैदानात ते पाहायलाही मिळालं. पण शेवटी निकाल हवा तसा लागला नाही. कोणत्याही संघासाठी विजय मिळणं अधिक महत्त्वाचे असते, जर ते साध्य झालं नाही तर वैयक्तिक कामगिरी निर्थक आहे, असेही गंभीरनं यावेळी बोलून दाखवले. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात अर्धा संघ तंबूत धाडला. ही कामगिरीही सकारात्मक होती. पण शेवटी गोष्ट तिथेचं येते की, तुम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरता. जे टीमला जमलं नाही.
टीम इंडियाविरुद्ध यजमान इंग्लंडनं दुसऱ्यांदा जिंकली ३५० पारची लढाई
हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडच्या संघासमोर ३७१ धावांचे टार्गेट सेट केले होते. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला. याआधी २०२२ मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं ३७८ धावा करत सामना जिंकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियासमोर इंग्लंडच्या संघाने ३५० पारची लढाई जिंकून दाखवलीये.
Web Title: IND vs ENG 1st Test Leeds There Are Three More Centuries India Head Coach Gautam Gambhir When Asked About Rishabh Pants Twin Hundreds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.