Join us

"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?

KL Rahul Century Press Conference, IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या डावात राहुलची १३७ धावांची धमाकेदार खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:55 IST

Open in App

KL Rahul Century Press Conference, IND vs ENG 1st Test: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक ठोकले. पहिल्या डावात ४२ धावांवर बाद झाल्यानंतर, दुसऱ्या डावात राहुलने अतिशय संयमी खेळी केली. त्याने २४७ चेंडूंचा सामना करताना १३७ धावा केल्या. रोहित शर्माच्या निवृत्तीमुळे केएल राहुलला सलामीवीराची जागा परत मिळाली. त्याआधी गेल्या काही वर्षात राहुलने तिसऱ्या क्रमांकापासून ते सहाव्या-सातव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. याच मुद्द्यावरून चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुलने मत मांडले.

मी विसरलोच होतो...

"गेल्या काही वर्षात मी माझ्या फलंदाजीचा क्रमांक विसरलो होतो. मला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करताना जास्त चांगले वाटते, याचाच मला विसर पडला होता. पण मला जी जबाबदारी आणि भूमिका देण्यात आली होती, ती मी आनंदाने पार पाडत होतो. कारण त्यामुळे मला खेळ खेळताना अजूनही उत्साह वाटायचा. स्वतःलाच आव्हान देणे मला आवडते. त्यामुळे मला अधिक कष्ट करण्याची ऊर्जा मिळते. गेल्या दोन वर्षात मी हा अनुभव घेतला आणि मला तो खूपच आवडला," असे राहुलला म्हणाला.

आता मी समाधानी...

"गेल्या दोन मालिकांमध्ये मला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. मी लहानपणापासूनच या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाही मी सलामीवीर म्हणूनच संघात आलो. आता पुन्हा त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. संघासाठी चांगली कामगिरी करता येते, याचे मला खूप समाधानही वाटत आहे," अशा शब्दांत राहुलने आपले मत व्यक्त केले.

ही भावना खूपच विचित्र...

राहुल पुढे म्हणाला, "चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी धावसंख्या न उभारता येणं हे कुठल्याही फलंदाजासाठी वेदना देणारेच असते. तुमच्या संघासाठी तुम्हाला मोठी धावसंख्या करता येत नाही, ही भावना खूपच विचित्र असते. मी ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीला चांगली फलंदाजी केली आणि मला त्याचा अभिमान आहे पण मालिका संपताना शेवटच्या काही डावांमध्ये मला मोठ्या धावसंख्येची खेळी करता आली नाही याचे दुःख अजूनही वाटते."

चुकांमधून शिकायला हवे!

"मला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली होती पण त्याचे सोने करता आले नाही. चुकांमधून शिकणे हाच सर्वात महत्त्वाचा गुण असतो. आता मी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी खेळी कशी खेळता येईल याचा विचार करत असतो आणि त्यानुसार माझी खेळी खेळत राहतो," असेही राहुलने सांगितले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५लोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा