Rohit Sharma Abhishek Sharma Comparison, Ind vs Eng 1st T20 : भारतीय संघाने दमदार खेळी करत कामगिरी करत इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सहज विजय मिळवला. प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला २० षटकात केवळ १३२ धावांवर बाद केले. त्यानंतर १३३ धावांचा पाठलाग करताना भारताने १२.५ षटकांतच सामना जिंकला. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करून दाखवली. वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या चौघांनी या सामन्या आपली चमक दाखवली. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने यातील एका खेळाडूची तुलना थेट रोहित शर्माशी केली.
काय म्हणाला आकाश चोप्रा?
भारताकडून खेळताना सलामीवीर अभिषेक शर्माने तुफानी फटकेबाजी केली. त्याने ३४ चेंडूत ७९ धावा ठोकत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना सावरण्यासाठी फारसा वेळ मिळू शकला नाही. त्याची तुलना आकाश चोप्राने रोहित शर्माच्या फटकेबाजीशी केली. "अभिषेक शर्मा... आम्हा भारतीयांचा शर्मा या अडनावाच्या क्रिकेटर्सवर फार विश्वास आहे. रोहित शर्माच्या बाबतीत पण आम्ही असेच म्हणायचो आणि तो आमचा विश्वास सार्थ ठरवायचा. अभिषेक शर्माच्या बाबतीत असं विधान करणं हे थोडं घाईचं होईल याची मला पूर्ण कल्पना आहे पण अभिषेकने बऱ्याच टी२० सामन्यांमध्ये संघाला तुफानी सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे त्याची प्रतिभा लपून राहू शकत नाही. इंग्लंडविरूद्धची त्याची खेळी खूपच खास होती," अशा शब्दांत आकाश चोप्राने त्याची स्तुती केली.
दरम्यान, पहिल्या टी२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना फारशी फटकेबाजी करू दिली नाही. दीडशेपार सहज धावसंख्या होऊ शकणाऱ्या ईडन गार्डनच्या पीचवर इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. कर्णधार जॉस बटलर याने ४४ चेंडूत ६८ धावांची संघर्षमय खेळी केली. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने कोणाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. बटलर नंतर सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज हॅरी ब्रूक हा केवळ १७ धावा करु शकला. भारताकडून वरून चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. १३३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने ३४ चेंडूत ७९ धावा करून भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सोपा केला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरच्या वेगवान माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांना काहीशा अडचणी आल्या. पण अखेर तेराव्या षटकात तिलक वर्माच्या नाबाद १९ धावांच्या बळावर भारताने सहज विजय मिळवला.