Goa Police Crime, Champions Trophy 2025 IND vs BAN: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली. भारताविरूद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने तौहिद हृदयचे शतक आणि जाकर अलीच्या अर्धशतकाच्या बळावर ४९.४ षटकांत सर्वबाद २२८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने नाबाद शतक आणि रोहित, राहुलच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताने हा सामना ४६व्या षटकातच जिंकला. दुबईत हा सामना सुरु असताना, गोव्यात मात्र बंद खोलीत वेगळाच खेळ सुरु होता, त्यात तिघांना अटक करण्यात आली.
नक्की काय घडला प्रकार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावर सट्टा लावण्याचा प्रयत्न करताना गोवापोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. पणजी जवळील पिलार्णे गावात भाड्याच्या घरात काही तरुण भारत-बांगलादेश सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून तीन तरुणांना अटक केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी या गावात तीन तरुण सामन्यावर सट्टा लावत असल्याचे कळले. याबाबत माहिती मिळताच गोवा पोलिसांनी घरावर छापा मारत रिझवान भाश (२०), आसिफ झियाउद्दीन (२५) आणि मकसूद मोदन (२८) यांना अटक केली. तिघेही गुजरातचे रहिवासी आहेत.
चार मोबाईल, एक लॅपटॉप जप्त
शुक्रवारी सकाळी एका पोलिस अधिकाऱ्याने या बेटिंग प्रकरणाची माहिती दिली. पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोव्यातील एका घरावर छापा टाकला आणि तीन तरुणांना अटक केली. पोलिसांनी तरुणाकडून एक लॅपटॉप, चार मोबाईल फोन आणि एक राउटर जप्त केले. त्याची किंमत १.१ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीत अप्रतिम सुरुवात केली होती. अवघ्या ३५ धावांत बांगलादेशचे ५ गडी बाद झाले होते. पण तौहिद हृदय आणि जाकेर अली या दोघांच्या भागीदारीने बांगलादेश सावरला. हृदयने ११८ चेंडूत १०० धावा केल्या तर जाकेर अलीने ११४ चेंडूत ६८ धावा केल्या. या दोघांमुळे बांगलादेशला २२८ धावा करता आल्या. भारताने २२९ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. रोहित शर्माने ४१ धावा केल्या. विराट कोहलीने २२ धावा केल्या तर लोकेश राहुलने नाबाद ४१ धावांची खेळी केली. शुबमन गिल सलामीला आणि नाबाद राहिला. त्याने १२९ चेंडूत १०१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.