Shreyas Iyer Angry : मागील काही सामन्यांमध्ये शॉर्ट बॉलचा सामना करण्यात अयशस्वी ठरलेल्या श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरूद्ध शानदार खेळी केली. आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडेवर अय्यरने स्फोटक खेळी केली. मैदानाच्या चारही दिशेला शॉट मारून टीकाकारांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले. शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी अप्रतिम खेळी करून भारताची धावसंख्या ३५० पार पोहचवली. भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३५७ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पूर्णपणे चीतपट झाला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अय्यरला पत्रकाराने विचारलेला प्रश्न खटकला अन् त्याने मागील सामन्यांचा दाखला देत संताप व्यक्त केला.
भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक (९२) धावांची खेळी केली, तर विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) यांनी चांगली खेळी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने २४ चेंडूत ३५ धावा करून भारताची धावसंख्या ३५० पार पोहचवली. खरं तर सामन्यानंतर पत्रकाराने श्रेयसला शॉर्ट बॉलबद्दल विचारले असता तो संतापला. पत्रकाराने म्हटले, "श्रेयस विश्वचषकात तुला शॉट बॉलने खूप त्रास दिला. पण तू श्रीलंकेविरूद्ध अप्रतिम खेळी केलीस... दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी तुझी तयारी कशी आहे? कारण ते शॉट बॉल टाकण्यासाठी एक्सपर्ट आहेत?
पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त करताना अय्यरने सांगितले की, तु्म्ही माझ्या प्रॉब्लेमबद्दल बोलत आहात काय? याचा अर्थ काय आहे? मला शॉर्ट बॉल त्रासदायक वाटतो? मी आतापर्यंत कितीवेळा हा शॉट खेळला तुम्ही एकदा पाहा, ज्या चेंडूवर चौकार देखील मारले आहेत. जर तुम्ही चेंडूवर मोठा फटका मारायचा प्रयत्न करत असाल तर कोणत्याही चेंडूवर बाद होऊ शकता. मग तो शॉट बॉल असो की मग ओवर पिच. मी जर तीनवेळा बोल्ड बाद झालो तर मला इन स्विंग चेंडू समजत नाही असे म्हणणार का?
भारताचा विजयरथ कायम
श्रीलंकेला ३०२ धावांनी पराभूत करून भारताने चालू विश्वचषकात सलग सातवा विजय मिळवला. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवून विजयी सलामी दिल्यानंतर विजयाचा षटकारही मारण्यात टीम इंडियाला यश आले. भारत आपल्या आगामी सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडेल, तर साखळी फेरीतील अखेरचा सामना नेदरलॅंड्सशी होईल.