लाहोर - बांगलादेशला आगामी टी-२० विश्वचषकातून वगळण्यात आल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली. पाक संघाच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल, असे त्यांनी जाहीर केले. नकवी म्हणाले की, हा विषय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर मांडला जाईल. पंतप्रधान सध्या देशाबाहेर असून, ते परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.
नकवी म्हणाले, ‘आम्ही टी-२० विश्वचषक खेळायचा की नाही, हे सरकार ठरवेल. पंतप्रधान परतल्यावर आम्ही त्यांचा सल्ला घेऊ. सरकारचा निर्णय हा अंतिम आणि आमच्यासाठी बंधनकारक असेल. जर सरकारने आम्हाला ‘नकार’ दिला, तर आयसीसी दुसऱ्या कोणत्याही संघाला आमंत्रित करू शकते.’
आयसीसीच्या बैठकीत बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याच्या मागणीला पाठिंबा देणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता, तर इतर १४ सदस्य देशांनी याविरोधात मतदान केले. यावर भाष्य करताना नकवी म्हणाले, ‘बांगलादेश हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठा भागधारक आहे आणि या प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्या या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत, जी वेळ आल्यावर मी उघड करीन.’
जागतिक क्रिकेट संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नकवी यांनी आरोप केला की, एक सदस्य देश नकारात्मक प्रभाव टाकत आहे. ते म्हणाले, ‘एक देश निर्णय लादत आहे. जेव्हा पाकिस्तान आणि भारतासाठी ठिकाण बदलून सुविधा दिली गेली, तेव्हा बांगलादेशसाठी तसे का केले नाही? आमचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही आयसीसीच्या अधीन नसून आपल्या सरकारला उत्तरदायी आहोत.’