टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी भारतीय संघाने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. सातत्याने अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला बाकावर बसवा, असा सल्ला माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान समालोचक मोहम्मद कैफनं टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांना दिला आहे. कोणताही संकोच न करता त्याच्या जागी सर्वोत्तम पर्याय निवडा, असे म्हणत कैफनं कुणाला संधी मिळावी, तेही सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्माला विश्रांती द्या अन्....
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलसंदर्भात कैफ म्हणाला आहे की, "अभिषेक शर्माला विश्रांती देण्यात काहीच गैर नाही. टी-२० सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये बदल करणे शक्य असते. भारताकडे पर्याय आहेत. त्याच्या जागी रिंकू सिंहला खेळवणं अधिक फायद्याचे ठरेल. अभिषेक शर्मा अजून आयसीसी स्पर्धांमध्ये तुलनेने नवीन आहे, तर सॅमसनला मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. त्यांच्या मते, “संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये ८००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. अभिषेक शर्माला मोठ्या स्पर्धेसाठी तयार होण्यासाठी आणखी वेळ द्यायला हवा."
T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी
फिरकीसमोर सपशेल अपयशी
यंदाच्या हंगामात अभिषेक शर्माचा फॉर्म समाधानकारक राहिलेला नाही. त्याने फक्त एकदाच ५० धावांचा टप्पा पार केला असून स्पिन गोलंदाजीविरुद्ध तो अडखळत खेळताना दिसला आहे. प्रतिस्पर्धी संघांनी त्याची कमकुवत बाजू लक्षात घेत पॉवरप्लेमध्ये स्पिनर आणले. या स्पर्धेत चार वेळा अभिषेक स्पिनरच्या गोलंदाजीवर फसला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि स्ट्राइक रोटेट करण्यास किंवा डाव सावरत खेळण्यास त्याला जुळवून घेता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर डाव खेळणं धोकादायक आहे, असे स्पष्ट मत मोहम्मद कैफनं मांडले आहे.
आजारी पडला अन् आत्मविश्वास ढळला
अभिषेक शर्मासाठी ही पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर आजारी पडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. अभिषेकला पोटाचा संसर्ग झाला होता. नामिबिया विरुद्धच्या सामन्यात बाहेर बसल्यावर तो पुन्हा प्लेइंग इलेव्हमध्ये आला पण फलंदाजीसह क्षेत्रक्षणा वेळीही त्याच्याकडून चुका झाल्या. या सर्व गोष्ट लक्षात घेऊन मेगा फायनल आधी टीम इंडिया खरंच त्याच्यापलिकडे जाऊन विचार करणार की, आपल्या विनिंग टीमसोबत मैदानात उतरुन त्याला आणखी एक संधी देणार ते पाहण्याजोगे असेल.