Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत

संजूच्या खेळीनंतर 'गंभीर' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:11 IST

Open in App

‘सिटी ऑफ जॉय’ कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनने खेळलेली संयमी पण आक्रमक खेळी देशभरातील चाहत्यांसाठी आनंदोत्सव ठरली. टीम इंडियातील सर्वाधिक दुर्लक्षित चेहरा अशी ओळख असलेल्या संजूनं संधीची शांतपणे वाट पाहत वेळ आल्यावर संघासाठी धावून येण्याची आपली वृत्ती पुन्हा दाखवून दिली. मात्र त्याच्या या खेळीनंतर गौतम गंभीरने केलेलं विधान अनेकांना खटकणारं ठरलं. विशेषतः एमएस धोनीच्या चाहत्यांसह कट्टर चेन्नईकरांना हे वक्तव्य पचनी पडणार नाही. नेमकं काय म्हणाला गंभीर? आणि त्याचं धोनी-चेन्नई कनेक्शन काय आहे, जाणून घेऊया...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजूच्या खेळीनंतर 'गंभीर' वक्तव्य चर्चेत

भारताचा माजी क्रिकेटर आणि विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. भारत-वेस्ट इंडिज सामन्यानंतर त्याने संजू सॅमसनचं कौतुक केलं, मात्र शिवम दुबेच्या बॅटमधून आलेले दोन चौकार सामन्याला कलाटणी देणारे ठरल्याचंही नमूद केलं. ज्या सामन्यात एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही, तिथे ९७ धावांची जिगरबाज खेळी करत शेवटपर्यंत उभा राहिलेल्या संजूच्या खेळीच्या तुलनेत ‘दोन चौकार’ अधोरेखित करणं अनेकांना खटकणारं ठरलं. काही चाहत्यांना यात गंभीरने पूर्वी केलेल्या ‘वर्ल्ड कप विजय हा केवळ एका षटकारामुळे नव्हता’ या विधानाची आठवण झाली.

…तर भारत-इंग्लंड सामन्यातूनच मिळणार T20 World Cup 2026 चा विजेता? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं खरं कारण

आधी रंगली होती गंभीर-धोनी यांच्यातील ३६ च्या आकड्याची चर्चा; त्यात आता संजूसंदर्भातील नव्या वक्तव्याची भर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावांची मोलाची खेळी केली होती. मात्र विजयाचा क्षण धोनीच्या षटकारामुळे अधिक लक्षात राहिला. त्यानंतर गंभीरने अनेकदा “वर्ल्ड कप केवळ एका षटकारामुळे जिंकला गेला नाही” असे विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली. याच पार्श्वभूमीवर गंभीर-धोनी यांच्यात ‘३६ चा आकडा’ असल्याच्या चर्चा रंगल्या. आता संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या खेळीनंतर शिवम दुबेच्या दोन चौकारांचा उल्लेख करत गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा जुना वाद उजाळ्यात आल्याची चर्चा आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते, हे मान्य असले तरी गंभीरचा टोन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy flares over Sanju's innings, echoes of Dhoni's six resurface.

Web Summary : Gautam Gambhir's comments on Sanju Samson's 97-run innings spark debate, drawing comparisons to his past remarks about Dhoni's World Cup-winning six. While acknowledging team contributions, Gambhir's emphasis on Shivam Dube's boundaries over Samson's resilient knock has reignited old controversies.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारत विरुद्ध इंग्लंडसंजू सॅमसनगौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनी