रविवारी अटीतटीच्या झालेल्या सुपर ८ च्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता ५ मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात यजमान टीम इंडियाची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. या लढतीसाठी टीम इंडियाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र आज भारतीय संघाच्या सरावावेळी एक वेगळंच चित्र दिसलं. आज चंद्रग्रहण असल्याने भारतीय संघाने आपल्या सरावाची वेळ बदलली. कुठल्याही प्रकारची अशुभ सुरुवात टळावी म्हणून भारतीय संघाने सरावाची वेळ बदलल्याचे सांगितले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय संघाने चंद्रग्रहणाबाबत प्रचतिल असलेल्या परंपरेला मान देत सराव सत्राच्या सुरुवातीच्या वेळेत बदल केला. चंद्र ग्रहण हे शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी योग्य मानलं जात नाही. त्यामुळे चांगल्या कामाची सुरुवात अशुभ वेळी होऊ नये यासाठी भारतीय संघाने ही वेळ टाळल्याचे सांगण्यास येत आहे.
भारत आणि इंग्लंडच्या संघामधील उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी आज संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत भारतीय संघ सराव करणार होता. मात्र आज दुपारी ३.२० वाजल्यापासून चंद्रग्रहण सुरू झालं होतं. तसेच हे चंद्रग्रहण संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत चाललं. भारतीय संघाला जेव्हा ग्रहणाच्या वेळेबाबत समजलं, तसेच या काळात कुठलंही शुभ कार्य सुरू करत नाहीत ही बाब विचारात घेऊन भारतीय संघाने हे सराव सत्र एक तास पुढे ढकलले.
विश्वचषकातील उपांत्य फेरीसारख्या सामन्यापूर्वी खेळाडू स्वत:ला मानसिकरीत्याही स्वत:ला तयार करत असतात. अशा परिस्थितीत सरावाची सुरुवात कुठल्याही नकारात्मक रुढीच्या छायेखाली होऊ नये, याची संघाने खबरदारी घेतली.