अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विश्वविजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विश्वविजेत्या भारतीय संघाचं खास कौतुक केलं आहे.
भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून भारतीय संघाचं कौतुक केलं. त्यात पंतप्रधानांनी लिहिलं की, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन. हा दैदिप्यमान विजय असामान्य कौशल्य, जिद्द आणि उत्तम सांघिक कामगिरीचं प्रतिबिंब आहे. या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीचा संयम आणि धडाडी दाखवून खेळ केला. विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या या विजयामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाचं हृदय हे अभिमान आणि आनंदानं भरून आलं आहे. शाब्बास टीम इंडिया, असं लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २५५ धावा फटकावल्या. तर या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या १५९ धावांत गारद झाला. अशा रीतीने भारतीय संघानं अंतिम सामना ९६ धावांनी जिंकला.