कोलंबो - आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या मालिकेत भारताने पाकिस्तानला चांगलेच धुतले. पाकिस्तानचा पराभव करत भारताने सुपर ८ मध्ये आपले स्थान बळकट केले आहे. तब्बल ६१ धावांनी भारताने हा सामना खिशात घातला. टीम इंडियाच्या विजयानंतर देशात सर्वत्र जल्लोष झाला. परंतु मैदानात घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या घटनेनंतर काही काळ भारतीय खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.
भारत पाकिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ विकेट गमावून १७५ धावा बनवल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानी टीम मैदानात उतरली परंतु १८ व्या षटकांतच सर्व पाकिस्तानी खेळाडू माघारी परतले. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी खेळाडूंचा फज्जा उडाला. ६१ धावांनी भारताने हा सामना जिंकला. इतक्या मोठ्या विजयानंतर सेलिब्रेशनच्या वातावरणात असं काही घडले ज्याने भारतीय खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमध्ये वातावरण तापले.
काय घडला प्रकार?
भारत पाकिस्तान सामन्यावेळी कुलदीप यादव याने बाऊंड्री लाइनवर शाहीन आफ्रिदीचा सोपा कॅच सोडला. १८ व्या षटकांत हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या बॉलवर शाहीनने स्लॉग खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल हवेत उंच उडाला. कुलदीप यादवला कॅचची संधी होती मात्र त्याच्या हातातून बॉल निसटून तो सीमे पलीकडे गेला. त्यामुळे शाहीनच्या खात्यात ६ धावा वाढल्या. याआधीच्या चेंडूवरही विकेटकिपर ईशान किशनने कॅच सोडला होता. सलग दोनदा संधी येऊनही ती निसटल्याने हार्दिक पांड्या संतापलेला दिसला. मॅच संपल्यानंतर जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात होते तेव्हा हार्दिकने कुलदीप यादवला खडे बोल सुनावले. कॅप्टन सूर्यकुमार यादवही कुलदीपवर नाराज होता. यावेळी तिलक वर्मा आणि रिंकु सिंह यांनी तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
हार्दिक पांड्याची नाराजी स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. जर कुलदीप यादवने तो कॅच पकडला असता तर त्याचवेळी मॅच संपली असती. मात्र कॅच सुटला आणि बॉलरच्या खात्यात आणखी ६ धावा वाढल्या. मोठमोठ्या सामन्यात खेळाडू कधीकधी भावनिक प्रतिक्रिया देताना दिसतात. हार्दिक पांड्या याने १८ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर उस्मान तारिकची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. भारतासाठी पाकिस्तानविरोधी विजय खूप महत्वाचा मानला जातो. एकीकडे टीम इंडियाने दबावातही जबरदस्त कामगिरी केली दुसरीकडे सामन्यातील छोट्या चुकाही किती गांभीर्याने पाहिल्या जातात हेदेखील दाखवून दिले.