भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हार्दिक विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
भारताने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत मैदानात रोमँटिक मूडमध्ये होता. गर्लफ्रेंडसोबत असतानाच त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्यावर आरोप काय?
टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू तिरंगा खांद्यावर घेऊन जल्लोष करत होते. हार्दिक पांड्याच्या अंगावरही तिरंगा होता. गर्लफ्रेंडसोबत विजयाचा आनंद साजरा करताना हार्दिक पांड्याने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत बसलेला होता. त्यानंतर तो जमिनीवर झोपला. त्यावेळी राष्ट्रीय ध्वज खाली पडला होता आणि तो त्यावर लोळलेला होता. असे करून हार्दिकने चुकीचे वर्तन करून तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्याविरोधात तक्रार कुणी दिली?
वकील वाजेद खान यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सेलिब्रेशन आणि रोमँटिक मूडमध्ये दिसला होता. त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. त्यावर लोकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रियाही दिल्या. अनेकांना हार्दिक पांड्याचे मैदानातील हे वर्तन आवडले नव्हते.