नवी दिल्ली - भारताने कसोटीचे नेतृत्व युवा शुभमन गिल याच्याकडे सोपवून योग्य निर्णय घेतला. आता या युवा फलंदाजाचे कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी त्याला दीर्घकाळ नेतृत्वाची संधी द्यावी, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी केली आहे. भारतीय संघ बदलाच्या या काळात अन्य देशांच्या तुलनेत हा मुद्दा योग्यपणे हाताळेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.
भारताला गिलच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असून संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू नाहीत. फिटनेसशी झुंजणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीदेखील संघाबाहेर आहे.
पाँटिंग म्हणाले, ‘माझ्या मते हा योग्य निर्णय आहे. अनेकजण आणि तज्ज्ञदेखील बुमराहला कर्णधारपदी का नेमले नाही, असा प्रश्न विचारतात. शुभमनकडे कर्णधारपद का? असा त्यांना प्रश्न पडतो. माझ्या मते याचे उत्तर अगदी सोपे आहे. बुमराह मागील काही वर्षांपासून अनेकदा जखमी होताना दिसतो. त्यामुळे नेतृत्वाच्या शर्यतीत तो माघारतो. वारंवार जखमी होणारा कर्णधार कसा काय असू शकेल? बीसीसीआयने युवा खेळाडूकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतलाच आहे, तर त्याची प्रतिभा सिद्ध होण्याइतपत प्रतीक्षा करा. गिलकडे दीर्घकाळ नेतृत्वाची धुरा कायम रहायला हवी.’
अनुभवी खेळाडूंची पोकळी भरून निघणे कठीण असते, असे सांगून पाँटिंग पुढे म्हणाले, ‘या परिस्थितीवर भारतीय संघ योग्य तोडगा काढू शकतो.