मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरला आहे. पण या सामन्यात झालेल्या एका घटनेने सुनील गावस्कर यांना राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज रासीख सलाम दार याला आलेल्या क्रॅम्प्समुळे खेळ वारंवार थांबवावा लागला. मात्र, यामुळे गावस्कर संतापले आणि त्यांनी रासीख सलाम दार मैदानावर जाण्याचा सल्ला दिला.
मुंबई इंडियन्सच्या डावातील १६ व्या षटकादरम्यान रासीख सलाम दारला गोलंदाजी करताना तीन वेळा क्रॅम्प आला. एकाच षटकात तीनवेळा वैद्यकीय मदत घ्यावी लागल्याने खेळाचा वेग मंदावला. यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची लय बिघडत होती आणि सामन्याचा वेळही वाया जात होता. या गोष्टी सुनील गावस्कर यांना खटकल्या आणि त्यांनी लाईव्ह सामन्यातच आरसीबीच्या संघाला खडेबोल सुनावले.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
"जर एखाद्या खेळाडूला वारंवार क्रॅम्प येत असेल तर, मैदानाबाहेर जा, उपचार घ्या आणि मगच परत या. उर्वरित षटक दुसऱ्या गोलंदाजाकडून पूर्ण करून घ्यावे. पण इथे वेगळच सुरू आहे. एकाच षटकात तीनवेळा फिजिओ मैदानात येतोय. वारंवार याच गोष्टी करत बसायच्या का? सवाल गावस्कर यांनी विचारला. गावस्करांच्या मते, जर खेळाडूला त्रास होत असेल तर त्याने वेळ न घालवता मैदान सोडावे, जेणेकरून खेळाची गती कायम राहील. अखेर पंचांनी हस्तक्षेप करत रासीखला गोलंदाजी करण्यापासून रोखले, कारण नियमानुसार दुखापतीनंतर मैदानाबाहेर गेलेल्या खेळाडूला ठराविक वेळ मैदानावर राहिल्याशिवाय पुन्हा गोलंदाजी करता येत नाही. अखेरचे षटक रोमारिओ शेफर्डने पूर्ण केले.
आरसीबीचा १८ धावांनी विजय
हा सामना तब्बल ४ तास २२ मिनिटे चालला. सुपर ओव्हर किंवा पावसाचा व्यत्यय नसताना खेळवला गेलेला हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरला आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २४०/४ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स २२२/५ धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि आरसीबीने हा सामना १८ धावांनी जिंकला.