Join us

'राजकीय इनिंग'साठी भाजपाचीच निवड का केली? केदार जाधव म्हणाला- "छत्रपती शिवाजी महाराजांना..."

Kedar Jadhav Joins BJP in Politics: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:23 IST

Open in App

Kedar Jadhav Joins BJP in Politics: टीम इंडिया आणि IPL चे मैदान गाजवल्यानंतर माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणात सक्रीय झाला आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर केदारने समालोचकाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता तो राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करताना दिसणार आहे. केदार जाधवने आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या मुंबईतील कार्यालयात पक्षप्रवेश केला. राजकीय कार्यासाठी भाजपाचीच निवड का केली, याबाबत त्यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले.

भाजपाचीच निवड का? केदार म्हणाला...

रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे भगवे उपरणे केदार जाधवच्या गळ्यात घालून पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले. त्यानंतर केदारने उपस्थितांशी संवाद साधला. तो म्हणाला, "सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जे विकासाचे राजकारण सुरु ठेवले आहे, त्यात मलाही खारीचा वाटा उचलायचा आहे. याच उद्देशाने मी आज भाजपात प्रवेश केला आहे. तुम्हा सर्वांचा मला पाठिंबा असेल याची खात्री आहे. पक्षासाठी जे करायला सांगतील ते करण्याची माझी तयारी असेल."

केदार जाधवने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांशीही संवाद साधला होता. त्यावेळेपासूनच केदारच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. केदार जाधव हा राजकारणात प्रवेश करणारा पहिला खेळाडू नाही. या आधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, माजी सलामीवीर गौतम गंभीर, पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री मनोज तिवारी या खेळाडूंनीही क्रिकेटनंतर राजकारणाच्या पिचवर फलंदाजी केली आहे. त्यांच्यापाठोपाठ आज केदार जाधवनेही राजकीय पक्षप्रवेश केला.

केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द

टीम इंडियातून खेळलेला मराठमोळा केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. टीम इंडियाकडून त्याने ७३ वनडे सामन्यात १३०० हून जास्त धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने ९ टी२० सामन्यात केवळ १२२ धावा केल्या. IPL मध्ये त्याची कारकीर्द चांगली होती. २०१० पासून त्याने एकूण ९५ सामन्यात १२००हून जास्त धावा केल्या. २०२४ मध्ये त्याने RCB कडून शेवटचा हंगाम खेळला.

 

टॅग्स :केदार जाधवभाजपाचंद्रशेखर बावनकुळे