क्रिकेट विश्वातून मोठी खळबळ उडविणारी बातमी येत आहे. भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग याचा घटस्फोट होत आहे. आरती अहलावत हिच्यासोबत मांडलेला २० वर्षांचा संसार मोडण्याच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. २००४ पासून लग्नबेडीत असलेल्या या जोडप्याने एकमेकांना इन्स्टावरून अनफॉलो केल्याने ही चर्चा सुरु झाली आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे वेगवेगळे राहत आहेत. सेहवाग कुटुंबाशी संबंधीत असलेल्या सुत्राच्या हवाल्याने त्यांनी हे वृत्त दिले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असल्याने हे दोघे वेगळे राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सेहवागला दोन मुले आहेत. आर्यवीर हा २००७ साली जन्माला आला तर वेदांतचा जन्म २०१० मध्ये झाला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीत सेहवागने इन्स्टावर फोटो टाकले होते. त्यात त्याची पत्नी आरती नव्हती. या फोटो विरेंद्रची दोन मुले आणि त्याची आई होती. तसेच सेहवागने आरतीला टॅगही केले नव्हते किंवा तिचे नावही घेतले नव्हते. आताच्या घडामोडींमुळे या दोघांच्या नात्यात नक्कीच काहीतरी बिनसले आहे, या चर्चेला बळ मिळत आहे.
एवढेच नाही तर, सेहवागने दोन आठवड्यांपूर्वी पलक्कड येथील विश्व नागायक्षी मंदिराला भेट दिली होती. इन्स्टाग्राम अकाउंटवर या सहलीचे फोटो शेअर केले होते. यातही आरतीचा कुठेही उल्लेख नव्हता. एरव्ही सोशल मीडियावर फार सक्रीय असणाऱ्या, हजरजबाबी सेहवागने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने घटस्फोटाच्या चर्च्यांना उत आला आहे, तसेच चाहत्यांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.