राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या निर्णयाचे भारताचा माजी फलंदाजानं कौतुक केलं आहे.
"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका,'' असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर, आता राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
''काल टाळया, थाळी वाजलं म्हणजे हा सायरन असून तो युद्धातील भोंग्याप्रमाणे आहे. राज्यभरात १४४ कलम लागू केलंय. पण, मला आजपासून संचारबंदी लागू करावी लागतेय. ही मौजमजा करण्याची वेळ नाही. म्हणून मी राज्यभरात संचारबंदी जाहीर करत आहोत,'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रानं निर्णयाचं स्वागत केलं. तो म्हणाला,''चांगला निर्णय. लोकं ऐकतंच नसतील, तर त्यांना कोणताही पर्याय देण्याची गरज नाही. घरीच राहा.''
उत्तर प्रदेशच्या आकाश चोप्रानं 10 कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 437 धावा केल्या आहेत.