आशिया कपमधील सर्वात हायव्होल्टेज ड्रामा १४ सप्टेंबरला खेळविला जाणार आहे. पहलगामचा क्रूर दहशतवादी हल्ला आणि भारताने राबविलेले ऑपरेशन सिंदूर यानंतर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर पहिल्यांदाच उभे ठाकणार आहेत. अशातच या सामन्याची तिकीटे काळ्या बाजारातही मिळेनासी व्हायला हवी होती, परंतू या सामन्याची तिकिटेच खपत नाहीएत.
भारत आणि पाकिस्तान सामन्यावर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. ११ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत या सामन्याची ५० टक्क्यांहून अधिक तिकीटे उपलब्ध होती. क्रिकेटरसीक तिकीटेच खरेदी करत नाहीएत. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना होत आहे. याच स्टेडिअमवर झालेल्या २०२३ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफी सामन्याची तिकीटे अवघ्या ४ मिनिटांत संपली होती.
या सामन्याच्या उपलब्ध असलेल्या तिकिटांमध्ये सुरुवातीची किंमत ९९ अमेरिकन डॉलर (८७४२ रुपये) ते प्रीमियम सीट्सची किंमत ४,५३४ अमेरिकन डॉलर (सुमारे ४ लाख रुपये) सर्वच प्रकारातील तिकीटे रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे २९ ऑगस्टला या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. आज याला १५ दिवस झाले तरी देखील ५० टक्क्यांहून अधिक तिकीटे विकली गेलेली नाहीत.
भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर काही भारतीय क्रिकेटरांसह अनेकांनी या सामन्यावर भारतीय संघाने बहिष्कार टाकावा अशी मागणी केली होती. यानंतर भारत सरकारने भारत-पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार नाही परंतू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळू शकतील अशी स्पष्टोक्ती दिली होती. बीसीसीआयच्या पथ्थ्यावर पडणारा निर्णय घेण्यात आला होता. तरीही भारतीय क्रिकेटरसिकांना हे फारसे रुचलेले दिसत नाहीय.