ढाका - बांगला देश क्रिकेट संघाने भारतात जीवाला भीती असल्याचे सांगून आगामी टी-२० विश्वचषकातून माघार घेतली. त्याचवेळी देशातील ८० ते ९० क्रीडा पत्रकारांनी विश्वचषकातील सामन्यांच्या वृत्तांकनासाठी आयसीसीकडे अर्ज केले. त्यांना भारतात होणाऱ्या सामन्यांचे वृत्तांकन करण्याची इच्छा आहे.
आयसीसीने या क्रीडा पत्रकारांचे अर्ज फेटाळून लावल्याचे वृत्त प्रकाशित होताच, पुन्हा वाद निर्माण झाला. आयसीसीने बांगला देशच्या माघारीनंतर अॅक्रिडिटेशन प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती दिली.
सूत्रांनी सांगितले की, बांगला देशातील ८०-९० क्रीडा पत्रकारांनी अर्ज केले आहेत. त्यांचा संघ आयसीसी विश्वचषकात सहभागी झाला असता तरीही त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर परवानगी दिली नसती. बांगला देशचा कोटा पाहता त्यांचे ४० च्या वर पत्रकार असू शकणार नाहीत. आयसीसी इतक्याच पत्रकारांना अॅक्रिडिटेशन कोटा देऊ शकेल. आयसीसी नेहमी स्थानिक बोर्डाची सूचना लक्षात घेत असते.
ढाका येथे बांगला देश क्रिकेट बोर्डाच्या मीडिया समितीचे चेअरमन अमजद हुसेन यांनी हा मुद्दा आयसीसीकडे उपस्थित केला. त्यानंतर आयसीसीने सांगितले की, क्रीडा पत्रकारांना पुन्हा अर्ज करावे लागतील. अर्जांची छाननी केल्यानंतरच परवानगी बहाल करण्यात येईल. बांगला देशातील एका ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने सांगितले की, मी ८-९ आयसीसी विश्वचषक कव्हर केले. पहिल्यांदा माझा अर्ज फेटाळण्यात आला. आता पुन्हा अर्ज करण्याआधी बीसीबीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.’