बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ बाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवणार नसल्याचे बांगलादेशने स्पष्ट केले असून, यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. या निर्णयामुळे बांगलादेशला कोट्यवधींचा फटका बसणार असून, भारताच्या महसुलावरही याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशने आपल्या संघाचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल करण्यास नकार दिला. परिणामी, बांगलादेशने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाचा स्पर्धेत समावेश होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला अंदाजे २४० कोटी रुपये इतका मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल. यामध्ये प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि वार्षिक उत्पन्नाचा समावेश आहे. हा तोटा बीसीबीच्या एकूण वार्षिक कमाईच्या ६० टक्के इतका असू शकतो.
भारताचे किती नुकसान होईल?
बांगलादेशच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या महसुलावरही होईल. बांगलादेशी चाहते मोठ्या संख्येने भारतात येतात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात घट होईल. बांगलादेशचे चारपैकी तीन सामने कोलकात्यात आणि एक मुंबईत होणार होता. कोलकात्याला एकट्याला ३० ते ६० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो असा अंदाज आहे.