ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांत आटोपला आहे. कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय फोल ठरला. पर्थची खेळपट्टी ३५० किंवा ४०० धावा लावण्यासारखी नाही. पण या खेळपट्टीवर पहिल्या डावात किमान धावफलकावर २०० ते २५० धावा लावणे गरजेचे होते. पण टीम इंडियाला ते काही जमलेले नाही. कारण एकही स्टार खेळाडू कांगारु गोलंदाजांमोर टिकला नाही.
दोघांच्या पदरी आला भोपळा!
यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ५ धावा असताना जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या देवदत्त पडिक्कल यालाही संधीच सोन करता आले नाही. तोही शून्यावर बाद झाला.
फक्त चौघांनी गाठला दुरेही आकडा
टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नितीश कुमार रेड्डीनं ५९ चेंडूत ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्याशिवाय रिषभ पंत याने ७८ चेंडूत ३७ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांशिवाय जुरेल ध्रुव ११ (२०) आणि लोकेश राहुलनं २६(७४) धावांची खेळी केली. या चौघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
किंग कोहलीचा फ्लॉप शो!
भारतीय संघाने पहिल्या दोन विकेट्स गमावल्यानंतर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी किंग कोहलीवर होती. त्याने चांगली सुरुवातही केली पण तो पुन्हा अपयशी ठरला हेडलवूडनं त्याला ५ धावांवरतंबूत धाडले. वॉशिंग्टन सुंदर ४ (१५), हर्षित राणा ७ (५) कर्णधार जसप्रित बुमराहनं८ चेंडूत ८ धावा काढल्या.
ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूड ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड याने विराट कोहलीसह सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.