Mohsin Naqvi Asia Cup Trophy BCCI IND vs PAK Final: भारतीय संघाने आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहान याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने १९.१ षटकात १४६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक आणि शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने दोन चेंडू राखून हा सामना जिंकला. भारताने विजय मिळवला, पण पाकिस्तानी मंत्री व ACC अध्यक्ष मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी विजेतेपदाची ट्रॉफी भारतीय खेळाडूंची मेडल्स स्वत:च्या हॉटेल रूमवर नेली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नक्वी यांना ती ट्रॉफी गपचूप भारताला परत करण्यास सांगितली असून, त्यासाठी विशिष्ट दिवसांचा 'अल्टिमेटम'ही दिला आहे.
बीसीसीआयचा नक्वींना 'अल्टिमेटम'
टीम इंडियाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी घेतली आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. मोहसिन नक्वींच्या वर्तनाविरुद्ध बीसीसीआय आता कारवाई करण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसीन नक्वी यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी दिली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना आशा आहे की ते शक्य तितक्या लवकर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाला परत करतील. जर असे झाले नाही तर बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल. बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसी परिषदेत याचा निषेध आणि तक्रार करू शकते. याचा अर्थ मोहसीन नक्वी यांना ऑक्टोबरपर्यंत ट्रॉफी भारतात परत करण्यासाठी वेळ आहे.
भारताने जिंकला आशिया चषक
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीला बोलावले. सलामीवीर फरहान (५७) आणि फखर जमान (४६) या दोघांनी ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सैम आयुबने १४ धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ११३ असताना अयुब बाद झाला. त्यानंतर एकालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून कुलदीप यादवने चार तर बुमराह, वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (५), सूर्यकुमार यादव (१) आणि शुबमन गिल (१२) स्वस्तात बाद झाले. संजू सॅमसनने तिलक वर्माच्या साथीने भागीदारी केली पण तो २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्मा (नाबाद ५३) आणि शिवम दुबे (३३) यांच्या भागीदारीने भारताला विजयासमीप आणले. अखेर रिंकू सिंगने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.पाकिस्तानच्या फहीम अश्रफने तीन तर शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी एक-एक बळी घेतला.