कोलंबो - पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले; परंतु गौतम गंभीर या निर्णयाने आनंदी दिसला नाही. त्याच्या मते, पाच बळी घेणारा फिरकीपटू कुलदीप यादव या पुरस्काराचा खरा मानकरी होता. गंभीर म्हणाला, कुलदीप यादवशिवाय मला या पुरस्कारासाठी दुसरे कोणी दिसत नाही. कारण त्याने पाकिस्तानी फलंदाजांची फळी कापून काढली. मला माहीत आहे की, विराट आणि राहुल या दोघांनी शतके झळकावली आहेत. रोहित आणि गिलनेही अर्धशतके झळकावली आणि तीही अशा खेळपट्टीवर जिथे चेंडू स्विंग होत होता; पण जर कोणी ८ षटकांत ५ बळी घेत असेल आणि तेही पाकिस्तानविरुद्ध, तर ती मोठी गोष्ट आहे. कारण पाकिस्तानी फलंदाज फिरकीला चांगले खेळतात. त्यामुळे पुरस्कार कुलदीपलाच मिळायला हवा होता. दरम्यान, गंभीरच्या या वक्तव्यावरून विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले.