वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी पाहण्यासाठी अजित आगरकर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाला आहे. त्याने त्याच्या पहिल्याच संघ निवडीत युवा खेळाडूंना संधी दिली आणि यशस्वी जैस्वाल हा नवा कसोटी ओपनर भारताला मिळाला. ट्वेंटी-२० संघातही युवा खेळाडूंचाच भरणा पाहायला मिळत आहे. पण, यंदाचे वर्ष हे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे असल्याने आगरकरने अद्याप त्यात काही बदल केलेले नाहीत. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आगरकर कॅरेबियन बेटांवर दाखल झाला आहे. तेथे तो भारताच्या दोन खेळाडूंच्या आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाविषयी कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त समोर येतेय.
भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विन, जो मागील दीड वर्ष वन डे क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवड समितीने अश्विनला वन डे क्रिकेटमध्ये पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे अश्विनला आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडायचे का? हा प्रश्न आगरकरसमोर आहे. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादव ज्याला वन डे क्रिकेटमध्ये काही खास करता आलेले नाही. त्याला संधी द्यायची का? याचे उत्तर मिळवण्यासाठी आगरकर विंडीज दौऱ्यावर गेला आहे.

''वर्ल्ड कप स्पर्धेतून अश्विन बाद, हे आताच सांगणे चुकीचे ठरेल. हा निवड समितीचा निर्णय असेल. भारतीय खेळपट्टींवर अश्विन किती महत्त्वाचा आहे, हे आपल्या सर्वांना माहित्येय. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आगरकर राहुल द्रविड व रोहित यांच्याशी चर्चा करेल आणि आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाबाबत निर्णय घेतील,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर अश्विन केवळ दोन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात १ विकेट घेतली आहे. भारताकडे सद्याच्या घडीला युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा हे तीन पर्याय आहेत, जे विकेट्स घेतात. अक्षर पटेलही रांगेत आहेच. विंडीज दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतही अश्विन खेळणार नाही. निवड समितीने चहल व कुलदीप यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सूर्यकुमार यादवने वन डे क्रिकेटमधील आपली जागा पक्की केलेली नाही. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनानंतर सूर्याच्या वन डे वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा मावळून जातील. १५ सदस्यीय संघात लोकेश राहुलला पर्याय म्हणून इशान किशन व संजू सॅमसन आधीच रांगेत आहेत. “सूर्या निश्चितपणे योजनेचा भाग आहे, परंतु सध्या तो फक्त बॅकअप आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे नक्कीच त्याच्या पुढे आहेत. रिषभला स्थान मिळण्याची शक्यता नसल्याने १५ सदस्यीय संघात अतिरिक्त किपर महत्त्वाचा आहे. आगरकर याबाबत रोहित आणि राहुल यांच्याशी चर्चा करतील,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.