रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. भारताचा हा सलग ९वा ट्वेंटी-२० विजय आहे. अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या नावावर सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी जिंकली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी-२० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. त्यानंतर विराट कोहली ( १६) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांचा विक्रम येतो. घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५) व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( १४) हे आघाडीवर आहेत. पण, या विजयामुळे टीम इंडियाने इंग्लंडला धक्का दिला आहे.
भारताने ३-० अशा मालिका विजयानंतर
आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारताच्या खात्यातही आता २६९ रेटिंग गुण झाले आहेत. पण, इंग्लंडचे एकूण गुण हे १०,४८४ इतके असल्याने इंग्लंडची २६९ रेटिंग गुण असूनही दुसऱ्या स्थानी घसरण झाली. इंग्लंडचे एकूण गुण हे १०४७४ इतके आहेत. पाकिस्तान ( २६६), न्यूझीलंड ( २५५) आणि दक्षिण आफ्रिका ( २५३) हे अव्वल पाच संघांमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाने ४-१ अशा फरकाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली आणि ते २४९ रेटिंग गुणासह सहाव्या क्रमांकावर आहेत.