IND vs PAK U19 Asia Cup Final : अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाने यंदाच्या स्पर्धेतील अपराजित युवा टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. भारताचा दबदबा असणाऱ्या आशिया कप स्पर्धेत फायनल बाजी मारत पाकिस्तानच्या संघाने २०१२ नंतर दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या संघाने भारतासोबत संयुक्तरित्या जेतेपद पटकावले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने उभारला धावांचा डोंगर, अन्...
नाणेफेक जिंकल्यावर भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना समीर मिन्हासची विक्रमी शतकी खेळी १७२ (११३) आणि अहमद हुसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५६ (७२) धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३४७ धावा करत भारतीय संघासमोर ३४८धावांचे टार्गेट सेट केले होते.
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
पाकिस्तानच्या संघाने ठेवलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पण मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला. त्याच्याशिवाय कर्णधार आयुष म्हात्रे आणि अन्य फार्मात असलेल्या फलंदाजांनीही पाक गोलंदाजीसमोर नांगी टाकली अन् आठ वेळा आशिया कप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २६. २ षटकात १५६ धावांवर आटोपला. पाकिस्तानच्या संघाने १९१ धावांनी विजय नोंदवत १३ वर्षांनी आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरले.
अंडर-१९ पुरुष आशिया कप किती संघांनी जिंकला आहे?
आशिया कप स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासात भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तान आणि बांगलादेश या चार संघांनी आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने १२ हंगामापैकी ८ वेळा जेतेपद पटकावल्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही भारतीय संघच प्रबळ दावेदार होता. एकही सामना न गमावता भारतीय संघ फायनपर्यंत पोहचला होता. पण ३०० पारच्या लढाईत भारतीय संघ कमी पडला.