दुबई: टी-२० विश्वचषक २०२१ भारतातच होणार यावर शिक्कामोर्बत झालं आहे. तर २०२२ चा विश्वचषक स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिय करणार आहे. आज भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
२०२१ चा टी-२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये होऊ घातलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं यजमानदपद भारताकडे असणार, यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. तर २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला २०२१ मधील महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आता ही स्पर्धा २०२२ मध्ये ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येईल.
टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक
भारतात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेचा सामना १४ नोव्हेंबरला होईल. ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणारी स्पर्धादेखील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला असेल.
यंदाच्या १८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त अरब अमिरातीत १९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.