India China News: चीननंतरभारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. मात्र, आता या दोन्ही देशांमधील उत्पादनातील फरक हळूहळू कमी होत चालला आहे. यावर्षी देशातील गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीचे सर्व विक्रम मोडीत काढू शकते. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्रात झालेली वाढ आणि पिकाची चांगली स्थिती यामुळे हे शक्य होईल. गेल्या वर्षी ११७.९४ दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं, जे चीनच्या उत्पादनापेक्षा (सुमारे १४० मिलियन टन) फार कमी नाही.
तांदूळ उत्पादनात भारतानं आधीच चीनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं आहे. आता गव्हाच्या बाबतीतही असं घडल्यास ती मोठी उपलब्धी ठरेल. यामुळे केवळ देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित होणार नाही, तर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाच्या निर्यातीसाठी सक्षम होईल. मे २०२२ मध्ये देशांतर्गत अन्नसुरक्षा आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सध्या गव्हाचे पीक अतिशय उत्तम आहे आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. एकूणच उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चांगलं राहिल, असं कृषी मंत्र्यांनी नमूद केलं.
सध्या पिकाची स्थिती अतिशय उत्तम
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक एम. एल. जाट यांनी सांगितलं की, ३२ मिलियन म्हणजेच ३.२ कोटी हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. पिकाची स्थिती अजूनही मजबूत आहे. "सध्या पिकाची प्रकृती खूप चांगली आहे. सर्व काही ठीक राहिल्यास आपण १२० मिलियन टनांच्या उत्पादनापर्यंत पोहोचू." वेळेवर आणि लवकर झालेली पेरणी हे या चांगल्या अपेक्षेमागचं मुख्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ च्या रब्बी हंगामात २ जानेवारीपर्यंत विक्रमी ३३.४१ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात हे क्षेत्र ३२.८० दशलक्ष हेक्टर होते.
आकडेवारीवरून असंही दिसून आलंय की, एकूण पेरणी क्षेत्रापैकी ७३% पेक्षा जास्त भागात हवामानातील बदल सहन करू शकणाऱ्या आणि पोषक तत्वांनी समृद्ध असणाऱ्या बियाण्यांच्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. हवामानातील प्रतिकूल बदलांचा सामना करण्यासाठी हे वाण तयार करण्यात आले आहेत.
गहू हे रब्बी हंगामातील म्हणजेच हिवाळ्यातील मुख्य पीक आहे. याची पेरणी पूर्ण झाली असून कापणी मार्चमध्ये सुरू होईल. आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे की, भारत आणि चीनमधील उत्पादनातील फरक वेगाने कमी होत आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास भारत आगामी काही वर्षांत या बाबतीतही चीनला मागे टाकू शकतो.
