Marathi News : बंगळुरू : आयटी क्षेत्रात एकेकाळी एप्रिल महिना म्हणजे पगारवाढीची खात्री असायची, मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नफ्याचे प्रमाण (मार्जिन) टिकवून ठेवण्याच्या दबावामुळे आयटी कंपन्यांनी पगारवाढीचे निकष बदलेले आहेत. आता पगारवाढ ही केवळ कामगिरीवर नाही, तर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असणार आहे.
विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी अद्याप चालू आर्थिक वर्षासाठी पगारवाढीची घोषणा केलेली नाही.
कंपन्यांनी निकष बदलण्याची काय आहेत कारणे?
मार्जिन मॅनेजमेंट : कंपन्या आता ‘परफॉर्मन्स मॅनेजमेंट’ऐवजी ‘मार्जिन मॅनेजमेंट’वर लक्ष केंद्रित करत आहेत. खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर घाला घालणे हा सर्वात सोपा पर्याय वापरला जात आहे.
एआयचा प्रभाव : झेन्सारचे सीईओ मनीष टंडन यांच्या मते, पगारवाढ ही कायमस्वरूपी गुंतवणूक असते. बाजारातील मागणी अस्थिर आहे. त्यामुळे कंपन्या लवचीकता जपण्यासाठी पगारवाढ लांबणीवर टाकत आहेत.
ले-ऑफ आता सामान्य : पूर्वी कर्मचारी कपात हा शेवटचा पर्याय असायचा; पण आता खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी तो एक नियमित मार्ग बनला आहे.
सरसकट वाढ नाही
यंदा मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची किंवा वाढ रोखली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कंपन्या आता सरसकट पगारवाढ देण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने किंवा वर्षाच्या उत्तरार्धात देण्यावर भर देत आहेत.
