Race For RCB : आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू'च्या मालकीसाठी कॉर्पोरेट जगतात मोठी चढाओढ सुरू झाली आहे. या संघाची मूळ मालक असलेली 'डियाजिओ' कंपनी आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत असून, खरेदीदारांच्या शर्यतीत सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला आणि मनिपाल समूहाचे डॉ. रंजन पै यांसारखी दिग्गज नावे आघाडीवर आहेत.
१.५ अब्ज डॉलर्सची बोली
मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या विक्रीसाठी डियाजिओने २ अब्ज डॉलर (सुमारे १६,६०० कोटी रुपये) इतके मूल्यांकन अपेक्षित धरले आहे. मात्र, संभाव्य खरेदीदार सध्या १.५ ते १.७ अब्ज डॉलर्सच्या दरम्यान बोली लावत आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत बंधनकारक नसलेली बोली सादर करण्याची मुदत संपली असून, आता पुढील आठवड्यात बोली लावणाऱ्यांची 'शॉर्टलिस्ट' तयार केली जाणार आहे.
प्रमुख दावेदार आणि त्यांची युती
- डॉ. रंजन पै : मनिपाल समूहाचे चेअरमन डॉ. पै हे अमेरिकन खाजगी इक्विटी दिग्गज केकेआर आणि टेमसेक यांच्यासोबत युती करून बोली लावण्याच्या विचारात आहेत.
- अदार पूनावाला : सीरम इन्स्टिट्यूटच्या पूनावाला यांना TPG कॅपिटल या जागतिक गुंतवणूक संस्थेचे समर्थन असल्याची चर्चा आहे.
- इतर स्पर्धक : बेंगळुरूस्थित प्रेमजी इन्व्हेस्ट आणि जागतिक गुंतवणूक फर्म EQT यांनीही स्वतंत्रपणे रस दाखवला आहे.
आयपीएल संघांमध्ये गुंतवणुकीचा 'पाऊस'
आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू सध्या १८.५ अब्ज डॉलर (२०२५ च्या अभ्यासानुसार) इतकी प्रचंड झाली आहे. त्यामुळे केवळ आरसीबीच नाही, तर इतर संघांतही मोठे बदल होत आहेत.
- राजस्थान रॉयल्स : १ अब्ज डॉलर मूल्यांकनावर मोठा हिस्सा विकण्याच्या तयारीत.
- कोलकाता नाईट रायडर्स : मेहता ग्रुप आपला अल्प हिस्सा विकण्याची शक्यता आहे.
- गुजरात टायटन्स : नुकतीच टॉरेंट ग्रुपने ६७% हिस्सेदारी सुमारे ८३३ दशलक्ष डॉलरला खरेदी केली आहे.
वाचा - रेखा झुनझुनवालांना एका झटक्यात ८५८ कोटींचा लॉटरी; एलआयसीही मालामाल, 'ही' डील ठरली गेमचेंजर
गुंतवणूकदारांसाठी आरसीबी 'कुबेराचा खजिना' का?
आरसीबीची सध्याची ब्रँड व्हॅल्यू २६.९ कोटी डॉलर्स असून ती सर्व संघांमध्ये सर्वाधिक आहे. गुंतवणूकदार या लीगकडे आकर्षित होण्याची काही प्रमुख कारणे:
- निश्चित महसूल : मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिपमधून येणारी रक्कम आधीच ठरलेली असते.
- खर्चावर नियंत्रण : खेळाडूंच्या पगारावर मर्यादा असल्याने संघ तोट्यात जाण्याची शक्यता कमी असते.
- कमी पायाभूत खर्च : स्टेडियमची देखभाल बीसीसीआय करत असल्याने फ्रँचायझींना अतिरिक्त गुंतवणूक करावी लागत नाही.
