जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:05 IST2025-06-26T17:00:25+5:302025-06-26T17:05:49+5:30

Jagannath Puri Rath Yatra 2025 Celebration: भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या दिव्य सोहळ्याची अद्भूत अनुभूती दरवर्षी लाखो भाविक घेतात. जाणून घ्या...

jagannath rath yatra 2025 lakhs of devotees experience the amazing ceremony know about traditions and importance | जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व

जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व

Jagannath Puri Rath Yatra 2025: महाराष्ट्रात देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला जसे लाखो वारकरी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन अगदी तृप्त होतात, समाधानी पावतात. अगदी तसाच अद्भूत अनुभव आषाढ शुद्ध द्वितीयेला पुरी, ओडिशातील भाविक घेत असतात. आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा असते. केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातून नव्हे, तर जगातील अनेक ठिकाणाहून भाविक या रथयात्रेसाठी येतात. रथयात्रेत सहभागी होतात. दरवर्षी या रथयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचा आकडा लाखोंच्या घरात जातो. जगन्नाथ पुरी मंदिराच्या रथयात्रेच्या प्रथा, परंपरा, महत्त्व आणि महात्म्य अगदी थोडक्यात जाणून घेऊया...

भारतात अनेक मंदिरे अशी आहेत की, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भूत उत्सवांमध्ये केवळ स्थानिक नाही, तर देश-परदेशातून भाविक आवर्जून उपस्थिती लावत असतात. यापैकी एक म्हणजे ओडिसा पुरी येथील जगन्नाथ मंदिर. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा अद्भूत परंपरा आणि समृद्ध संस्कृतीचा एक सर्वोत्तम आदर्श असल्याचे मानले जाते. यंदा, शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा आहे. जवळपास सर्व तयारी आतापर्यंत पूर्ण झालेली असून, या रथयात्रेची ओढ भाविकांना लागलेली आहे. 

रथयात्रेचे स्वरुप कसे असते?

शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात, अशी मान्यता आहे. या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान ८ लाख भाविक सहभागी होत असतात. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत, असे म्हटले जाते.

रथयात्रेतील रथांची भव्यता

हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ रथयात्रेचे प्रमुख आकर्षण असते ते या यात्रेतील रथ. प्रत्येक वर्षी रथ घडवण्याची सुरुवात काही महिने आधीपासून होते. जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते, असे सांगितले जाते. 

रथ सुशोभित करण्यात पारंपारिक कारागिरांचे विशेष योगदान

या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते. या रथांचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही, असे सांगितले जाते.बलराम आणि सुभद्रा यांचा रथ लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथांचा रथ पिवळ्या किंवा लाल रंगाने सजवला जातो. रथ सुशोभित करण्यात पारंपारिक कारागिरांचे विशेष योगदान आहे. हे काम पूर्ण भक्तिभावाने आणि विधीनुसार केले जाते. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने आणि रथ ओढल्याने माणसाला सौभाग्य प्राप्त होते. रथयात्रेत सहभागी झाल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

जगन्नाथ पुरी मंदिराची अचंबित करणारी वैशिष्ट्ये

भगवान जगन्नाथाच्या या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली होती, असे सांगितले जाते. ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची २१४ फूट आहे. पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते, असे म्हटले जाते. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते. जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, असे सांगितले जाते. या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो. 

भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन 

भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो. या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही.

जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र 

जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र, येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी ७ भांडी एकमेकांवर ठेवली जातात. या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एकामागील एक एक भांड्यातील अन्न शिजते, असे सांगितले जाते. भल्यामोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० मदतनीस एकत्ररीत्या काम करतात.

 

Web Title: jagannath rath yatra 2025 lakhs of devotees experience the amazing ceremony know about traditions and importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.