नारायणवाडीकरांचा रुद्रावतार, मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:49 IST2019-04-19T00:48:22+5:302019-04-19T00:49:52+5:30
आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

नारायणवाडीकरांचा रुद्रावतार, मतदानावर बहिष्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, यावर प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.
शिरूर कासार तालुक्यातील नारायणवाडी हे १३५० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात ७३३ मतदार असून हे गाव निमगाव -वरंगळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतला जोडलेले आहे.
नारायणवाडी ते निमगाव या रस्त्याच्या कामाची मागणी ग्रामस्थांची होती. निवेदन दिल्यानंतरच्या तीन महिन्यात प्रशासनाचा प्रतिनिधी गावाकडे फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला व निर्णयावर ठाम राहिले.
नायब तहसीलदारांची मध्यस्थी
४लोकशाहीच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शिरूर नायब तहसीलदार किशोर सानप यांनी नारायणवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन मतदान करण्याचा आग्रह धरला, ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थ ठाम राहिले. तहसीलदार प्रिया सुळे यांनीही नारायण वाडीत जाऊन ग्रामस्थांना त्यांच्या मागण्यासंदर्भात आश्वासन दिले तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते.
केंद्रावर शुकशुकाट, ग्रामस्थ पारावर
४ प्रशासनाने गावातील शाळेत मतदान केंद्र स्थापित केले होते. मात्र समस्त नारायणवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.मात्र, ग्रामस्थ पारावर दिवसभर एकत्रच बसून होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन हवे
४प्रशासकीय पातळीवर आमचा ग्रामस्थांचा विश्वास राहिला नसून सध्याच्या स्थितीत फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले तरच आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार मागे घेऊ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याचे एस. के. काळे यांनी सांगितले.