Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:07 IST2019-10-17T14:58:10+5:302019-10-17T15:07:09+5:30
या निवडणुकीत 'रेकॉर्ड ब्रेक' विजय होईल

Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७०
परळी : दोन महिन्यांपूर्वी कलम 370 हटविल्याने न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेण्यात आला तेव्हा विरोधकांनी याला प्रचंड विरोधात झाला. भाजप पक्षाच्या जन्मापासून कलम ३७० ला विरोध करत आहे. हा राजनीतीचा निर्णय नसून देशहिताचा निर्णय आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीतील जाहीर सभेत केले. तसेच या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील जागेत बीड जिल्ह्यातील महायुती च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार प्रीतम मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह बीड जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
परळीत आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सभेस हजेरी लावली. भाषणात बाबा वैद्यनाथाच्या पावन भूमीत व गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत आलो असल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, बीड जिल्ह्याने मागील निवडणूकित भाजपला साथ दिली. या निवडणुकीतही रेकॉर्ड होईल असा विजय होईल, मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे, दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत, 2022 पर्यत घराघरात शुद्ध पाणी शासन पुरविणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. विविध 400 योजनांचे पैसे साडे आठ लाख करोड रुपये लाभार्थीच्या खात्यात शासन जमा करीत आहे. या निर्णयामुळे थेट पैसे लाभार्थ्यांना मिळत आहेत.
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहेत
ते पुढे म्हणाले की, सरकारने गरिबांना मोफत उपचार, घर , वीज,गॅस सिलेंडर दिले आहे. केंद्र सरकार जलजीवन मिशन योजने अंतर्गत येणाऱ्या 5 वर्षात घराघरात पाणी पोचविणार आहे पाण्यासाठी साडे तीन लाख करोड रुपये खर्च केले जाणार आहेत. गोपीनाथराव मुंडे यांचे परळी- बीड -नगर रेल्वेचे व ऊसतोड मजुरांच्या महामंडळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. बीड जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. महिला बचत गटाच्या कार्याचा उल्लेख करून बीड जिल्यात महिलांचे मतदान जास्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पंकजा मुंडे व सर्व उमेदवारांनी पंतप्रधानाचे वैद्यनाथाची मूर्ती देऊन स्वागत केले.
वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सभेस सुरुवात
परळीत आगमन होताच पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम 12 ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच प्रभू वैद्यानाथाच्या मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे. यानंतर ते सभेच्या ठिकाणी गेले.