"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:24 IST2025-12-18T15:21:51+5:302025-12-18T15:24:03+5:30
शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
ठाणे - शिंदेसेना आणि भाजपामध्ये आलेल्या वितुष्टामुळे दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात होता. युती झाली नाही तर शिंदेसेनेतील काही महत्त्वाच्या माजी नगरसेवकांचा भाजपाची कास धरण्याचा प्रयत्न होता. परंतु, युती झाली आणि ही संभाव्य फाटाफूट थांबली अशी भावना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली.
शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतून पालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरनाईक यांनी महायुतीच्या निर्णयाचे स्वागत केले. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये महायुती करून निवडणुका लढवण्याचा निर्णय हा संघटनात्मक ताकद वाढवणारा आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये पूर्ण युती होणार असल्याची घोषणा झाल्यामुळे अनेक वर्षापासून निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या शिवसैनिकांना नवी दिशा मिळाली असंही सरनाईकांनी म्हटलं.
संभ्रम दूर झाला
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही जण संभ्रमात होते, निवडणूक जवळ येताच काही जण वेगवेगळे पर्याय तपासत होते. मात्र महायुतीचा निर्णय झाल्यानंतर योग्य निर्णय कोणता हे सर्वांना समजले. ठाणे महापालिकेत शिवसेनेला मोठे यश मिळेल. येत्या महापालिका निवडणुकीत महायुती सरकारने केलेल्या कामांना जनतेकडून योग्य प्रतिसाद मिळेल असा दावाही मंत्री सरनाईक यांनी मेळाव्यात केला.
दरम्यान, ठाण्यातील कोपरी भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेसोबत युती नको अशी भूमिका घेतली आहे. आमदार संजय केळकर आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमधील वादामुळे इथल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी आहे. त्यात वरिष्ठ पातळीवर महायुती झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. याबाबत कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना पत्र लिहून त्यांची भूमिका कळवली आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.