होमपीचवर युतीचे प्रयत्न, मिरा-भाईंदरचं घोंगडं भिजत
By धीरज परब | Updated: December 30, 2025 08:39 IST2025-12-30T08:39:34+5:302025-12-30T08:39:34+5:30
या दोन्ही महापालिकांत युतीचं घोंगडं स्थानिक पातळीवर भिजत पडलं आहे.

होमपीचवर युतीचे प्रयत्न, मिरा-भाईंदरचं घोंगडं भिजत
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड असलेली ठाणे महापालिका -आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होम ग्राउंड कल्याण डोंबिवली महापालिका. या दोन्ही पालिकांत भाजप शिंदेसेनेने युतीत लढण्याच्या दृष्टीने चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातच असणाऱ्या मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकेबाबत अवघे काही तास शिल्लक असतानाही कोणतीच सकारात्मक चर्चाही झालेली नाही. या दोन्ही महापालिकांत युतीचं घोंगडं स्थानिक पातळीवर भिजत पडलं आहे.
काही कार्यकर्ते नाराज
स्वतःचे बालेकिल्ले राखण्याचे प्रयत्न करणाऱ्या शिंदे आणि चव्हाण यांनी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पालिकेतील युतीतील कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची नाराज भूमिका काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे पालिकेत आपले वर्चस्व राखून पालिका काबीज करण्यासाठी शिंदेसेना प्रयत्नशील आहे. मात्र भाजपला सोबत घेत युतीचा प्रयत्न केला जातोय. नवी मुंबईतही मंत्री गणेश नाईक यांनी आपण विकासकर्ते आहे सांगत भाजपला ९१ व शिंदेसेनेला २० जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा.
जुळवून घेण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण - डोंबिवली पालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. कल्याण-डोंबिवली हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होमपीच आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि चव्हाण यांनी एकमेकांशी जुळवून घेत युती करण्यावर भर दिला आहे.
बळाच्या आधारे समीकरणे
ठाणे महापालिकेत १३१पैकी शिंदेसेना २१, तर भाजप ४० अशी जागावाटपाची चर्चा आहे. पूर्वी पालिकेत शिवसेनेच्या ६७, तर भाजपच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. कल्याण डोंबिवलीमध्येही शिंदेसेना ६४, तर भाजपा ५८ जागा लढण्याची चर्चा आहे.
मीरा भाईंदरमध्ये २०१७ साली ९५पैकी भाजपा ६१ आणि शिवसेना २२ जागी जिंकली होती. परंतु, आता या ठिकाणी भाजपकडून सेनेला केवळ १३ जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे रविवारीच मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितले.
राजकीय समीकरणे लक्षात घेत मीरा - भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये भाजपने शिंदेसेनेला नमवून ठेवले आहे. भाजपचे बळ जास्त असून शिंदेसेनेला फुटकळ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. शिंदेसेनेला हद्दपार करण्याची ही रणनिती आहे.