एबी फॉर्म मिळताच फुलले चेहरे; संधी हुकलेल्यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:59 IST2025-12-31T12:59:44+5:302025-12-31T12:59:44+5:30
मीरा-भाईंदर, वसई-विरार निवडणुकीसाठी हजारो अर्ज : वाजत-गाजत निघाल्या मिरवणुका

एबी फॉर्म मिळताच फुलले चेहरे; संधी हुकलेल्यांना अश्रू अनावर
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली; मात्र सोमवारपर्यंत ६५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय इच्छुकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मिरवणुका काढल्या आणि अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे शेवटच्या दिवशी अनेकांमध्ये धाकधूक होती. त्यांत ज्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तर ज्यांची उमेदवारी नाकारली होती, अशा काहींचा संताप अनावर झाला होता तर काहींना अश्रूही अनावर झालेले दिसले.
३० डिसेंबरला सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज भरायचे असल्याने इच्छुकांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. बहुतांश इच्छुकांनी सकाळी देवदर्शन केले. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणापासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशा, बँड वाजवत फटाके फोडत, घोषणा देत - उमेदवार कार्यकर्त्यासह निघाल्याने - ठिकठिकाणी रस्त्यांवर कोंडी झाली - होती. अनेकांनी मिरवणुकीसह दुचाकी आणि चारचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असली तरी शेवटच्या दिवशी सर्वांनी अर्ज भरल्याने कार्यालयात गर्दी होती. ३ च्या आधी आलेल्या उमेदवारांचे उशिरापर्यंत अर्ज भरून घेण्याचे काम सुरू होते.
कार्यकर्ते ताटकळत
अर्ज भरण्यासाठी केवळ उमेदवार आणि सूचक-अनुमोदक इतक्याच लोकांना आत सोडले जात होते. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांसह आलेले समर्थक निवडणूक कार्यालया बाहेर रस्त्याच्या कडेला, झाडांच्या आडोशाला ताटकळत होते.
भरण्यासाठी गर्दी असल्याने शेवटच्या दिवशी अर्ज उमेदवारी अर्ज तपासून तो स्वीकारण्याकरिता उमेदवारांची आत रांग लागल्याने अनेकांनी बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना वाट न पाहता परत जाण्यास सांगितले.
कार्यकर्त्यांची अनेकांनी चहा-नाष्टा आदींची सोय केली होती. शहरात आज खऱ्या अर्थाने सर्वत्र निवडणुकीचे वातावरण अनुभवले.
ठिकठिकाणी वाहतूककोंडी
वसई-विरार मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सर्वच पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांनी शेवटच्या दिवसाचा मुहूर्त साधल्याने निवडणूक कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. विविध प्रभागांतील उमेदवारांनी युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.
हातात पक्षांचे झेंडे आणि गळ्यामध्ये रुमाल टाकून ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
पक्षनिहाय यादीसह आघाडी, युतीबाबत मंगळवारी सकाळपर्यंत घोळ सुरूच होता. मात्र, मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच २९ वॉर्डातील विविध इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.