वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:32 IST2025-06-11T18:30:46+5:302025-06-11T18:32:03+5:30
वारकऱ्यांची सोय होणार

संग्रहित छाया
मिरज : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांची सोय होणार आहे. दरवर्षी मिरजरेल्वे स्थानकावरुन आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरला जात असतात. या काळात रेल्वेच्या जादा गाड्यांची मागणी होत असते. त्यानुसार जादा गाड्यांना हिरवा कंदिल दाखविला आहे.
गाडी क्रमांक ०१२०५/०६ नागपूर ते मिरज ही गाडी दि. ४ व ५ जुलै रोजी नागपूरहून सकाळी ८.५० वाजता सुटेल. पंढरपूरला सकाळी ८ वाजता व मिरजेत दुपारी १२ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मिरजेतून दुपारी १ वाजता सुटेल. पंढरपूर येथे दुपारी ४ वाजता पोहोचेल. नागपूर येथे १२.२५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२०७/०८ पुणे-पंढरपूर मिरज ही पूर्णतः अनारक्षित गाडी दि. ३ ते ७ जुलैपर्यंत दररोज धावेल. ही गाडी पुण्याहून सकाळी ८.४० वाजता सुटेल, पंढरपूर येथे दुपारी ४.०० वाजता व मिरजेत सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मिरजेतून सायंकाळी ७.३० वाजता सुटेल, पंढरपूर येथे रात्री १० वाजता पोहोचेल व पुणे येथे पहाटे ४.३० वाजता पोहोचेल.
पूर्णत: अनारक्षित गाडी क्रमांक ०१२०९/१० कोल्हापूर-पंढरपूर कुर्डूवाडी या मार्गावर दि. १ ते १० जुलैपर्यंत दररोज धावेल. ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी ६.१० वाजता सुटेल. मिरजेत सकाळी ७.३० वाजता, पंढरपूर येथे दुपारी १२.१५ वाजता व कुर्डूवाडीत दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात कुर्डूवाडी येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल. पंढरपूर येथून सायंकाळी ५.३० वाजता, मिरजेत रात्री ८.२० वाजता व कोल्हापुरात रात्री १०.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१११०७/०८ मिरज ते कलबुर्गी ही पूर्णत: अनारक्षित गाडी दि. १ ते १० जुलैपर्यंत दररोज धावेल. ही गाडी मिरजेतून सकाळी पाच वाजता सुटेल. पंढरपूर येथे सकाळी ७.४० वाजता सोलापूर येथे दुपारी ११ व कलबुर्गी येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात कलबुर्गी येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल. सोलापूर येथे सायंकाळी ५.५० वाजता, पंढरपूर येथे रात्री ८.५५ व मिरजेत रात्री ११.५० वाजता पोहोचेल. या सर्व विशेष रेल्वेगाड्यांचा पंढरपूरला आषाढवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील, गजेंद्र कल्लोळी यांनी केले आहे.