Signs Your Partner Is Overcompensating With Love : कपलचं नातं हे प्रेम, विश्वास आणि आपुलकीवर टिकून असतं. जोडीदाराला मिठी मारणं, हात हातात घेणं किंवा प्रेम व्यक्त करणं या गोष्टी नातं अधिक घट्ट बनवतात. मात्र, जर तुमचा पार्टनर अचानक खूपच जास्त प्रेम दाखवू लागला असेल, सतत जास्त काळजी करू लागला किंवा नातं सुरुवातीपेक्षा अधिक “परफेक्ट” वाटू लागलं, तर काही वेळा हा इशाराही असू शकतो.
सुरुवातीला जास्त प्रेम, नंतर नात्यात दुरावा?
Journal of Personality and Social Psychology मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळले की, नात्याच्या सुरुवातीला अतिप्रमाणात प्रेम व्यक्त करणाऱ्या जोडप्यांमध्ये पुढे जाऊन घटस्फोटाची शक्यता अधिक होती. संशोधकांनी 168 जोडप्यांचा तब्बल 13 वर्षे अभ्यास केला. या अभ्यासात दिसून आलं की, जे लोक सुरुवातीपासूनच खूप जास्त रोमँटिक आणि ओव्हर-अफेक्शनट वागत होते, त्यांचं नातं कालांतराने कमकुवत होत गेलं. अशा जोडप्यांनी दीर्घकाळ आनंदी संसार करणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत जवळपास एक-तृतीयांश अधिक प्रेम व्यक्त केलं होतं.
अतिप्रेम धोक्याचं का ठरू शकतं?
डेटिंग अॅप Badoo शी संबंधित रिलेशनशिप सायकॉलॉजिस्ट क्लेअर स्टॉट यांच्या मते, काही वेळा गरजेपेक्षा जास्त प्रेम हे नात्यातील असुरक्षितता, कमी संवाद किंवा विश्वासाचा अभाव झाकण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, खूप जास्त इंटेन्स अफेक्शन कायम टिकत नाही. सुरुवातीला नातं जितकं “ओव्हर द टॉप” वाटतं, तितकंच नंतर रिकामेपण जाणवू शकतं.
‘हनीमून फेज’ आणि वास्तव
प्रत्येक नात्यात सुरुवातीला एक हनीमून फेज असतो. त्या काळात दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आकर्षण आणि जवळीक वाटते. पण वेळेनुसार हे आकर्षण थोडं कमी होणं स्वाभाविक आहे. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा संपूर्ण नातं फक्त तीव्र भावना आणि सततच्या रोमँटिक प्रदर्शनावर उभं असतं. अशावेळी नंतर ती तीव्रता कमी झाली की अनेकांना “प्रेम संपलं” असं वाटू लागतं.
मजबूत नात्याचा खरा पाया कोणता?
एक्सपर्ट सांगतात की, फक्त प्रेम व्यक्त केल्यानं नातं टिकत नाही. प्रामाणिकपणा, विश्वास, संवाद आणि एकमेकांना साथ देण्याची तयारी ही दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याची खरी ताकद असते. जर एखाद्या नात्यात प्रेम सतत “दाखवण्याचा” प्रयत्न जास्त होत असेल, तर ते ओव्हरकम्पेन्सेशनचं लक्षण असू शकतं.
‘लव्ह बॉम्बिंग’ म्हणजे काय?
एक्सपर्ट “लव्ह बॉम्बिंग”लाही मोठा रेड फ्लॅग मानतात. यात एखादी व्यक्ती सुरुवातीला समोरच्यावर खूप जास्त प्रेम, भेटवस्तू, सतत कौतुक आणि अटेंशनचा वर्षाव करते, जेणेकरून समोरची व्यक्ती पटकन भावनिकरित्या गुंतून जाईल. मात्र काही कालावधीनंतर हेच वागणं अचानक बदलतं. त्यामुळे दुसरा पार्टनर गोंधळून जातो आणि नातं पूर्वीसारखं करण्यासाठी स्वतःलाच दोष देऊ लागतो. तरीही, याचा अर्थ असा नाही की जास्त प्रेम करणारा प्रत्येक पार्टनर चुकीचाच असतो किंवा नात्यात तिसरी व्यक्ती असते. पण कोणत्याही नात्यात संतुलन, प्रामाणिकपणा आणि नैसर्गिकपणा टिकून राहणं सर्वात महत्त्वाचं असतं.
