Mothers Day : कवी यशवंत यांच्या 'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' या ओळी आपल्याला आठवत असतील. याचा अर्थ असा होतो की, आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या, जर आई नसेल तर तुम्ही भिकारीच रहाल. किती खोलवर अर्थ आहे या ओळींचा. आई हे नातंच असं आहे जिची जागा कुणीही घेऊ शकत नाही. आई कमी कुणीही भरून काढू शकत नाही.
जीवनात कितीही मोठा ताण असो, चिंता असो, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असो किंवा अचानक काही इजा झाली असो…या स्थितींमध्ये आपल्या तोंडून सर्वात आधी एकच शब्द बाहेर पडतो तो म्हणजे “आई!” किंवा “आई गं!”. पण असं का होतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण कितीही मोठे झालो तरी दुखापतीच्या क्षणी सर्वप्रथम आईच का आठवते? हेच आपण 'मदर्स डे'च्या निमित्ताने समजून घेणार आहोत. सायकोलॉजिस्ट मोनिका शर्मा यांनी 'जागरण'ला याबाबत माहिती दिली.
सुरक्षिततेची पहिली भावना
एक्सपर्ट सांगतात की, जन्मानंतर एका बाळासाठी आई हीच सुरक्षितता, आराम आणि प्रेमाचा पहिला स्रोत असते. लहानपणी भूक लागली, भीती वाटली किंवा दुखापत झाली की आईच आपल्याला जवळ घेते आणि शांत करते. अशात आपल्या मेंदूमध्ये कायमची एक भावना तयार होते की, “आई म्हणजे सुरक्षितता आणि वेदनेतून आराम.”
उच्चारायला सर्वात सोपा शब्द
यामागे मानसिक कारणांसोबत भाषिक कारणही आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आईसाठी “म” किंवा “आ” या ध्वनींचा वापर होतो जसे की, आई, माँ, मम्मी, मॉम, अम्मा. दुखापतीच्या वेळी तोंडातून नैसर्गिकरित्या “आह” असा आवाज बाहेर पडतो. ओठ हलके मिटल्यावर तो सहज “मा” किंवा “आई” सारख्या ध्वनीत बदलतो. त्यामुळे वेदनेच्या क्षणी हा शब्द सहजपणे बाहेर पडतो.
तणावात बालपणाची आठवण
मानसशास्त्रानुसार, एखादी व्यक्ती तीव्र तणाव, धक्का किंवा वेदनेत असताना मानसिकदृष्ट्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित काळाकडे म्हणजेच बालपणाकडे परत जाते. यालाच मानसशास्त्रात “Regression” असे म्हणतात. त्या क्षणी आपण नकळत त्या व्यक्तीला हाक मारतो, जिने आपल्याला निस्वार्थ प्रेम, काळजी आणि सुरक्षितता दिली होती आणि ती म्हणजे आई.
