आजच्या धावपळीच्या आयुष्यात ताण, चिंता आणि डिप्रेशन या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. मात्र विशेषतः महिलांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते, त्या आपला मानसिक त्रास उघडपणे व्यक्त करत नाहीत, तर मनातच ठेवतात. 'सगळं ठीक आहे' असं बाहेरुन दाखवत असताना आत मात्र मोठा संघर्ष सुरू असतो. (Mental Health Tips - why women hide health issues ? problems like depression occurs because ....)मला खचून चालणार नाही असं त्यांना वाटत असतं. पण मानसिक ताण हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. त्याला योग्य तेवढा वेळ आणि उपचार गरजेचे आहेत.
मानसिक ताण लपवण्याचे परिणाम हळूहळू पण गंभीर स्वरुपात दिसू लागतात. सुरुवातीला चिडचिड, झोप न लागणे, भूक कमी-जास्त होणे असे लक्षणं दिसतात. पुढे हेच वाढत गेलं तर Depression किंवा Anxiety disorder अधिक तीव्र होऊ शकतात. काही महिलांना सतत थकवा जाणवतो, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखे शारीरिक त्रासही वाढतात. म्हणजे मानसिक वेदना शरीरामार्फत व्यक्त होऊ लागतात.
याचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर तिच्या नातेसंबंधांवरही होतो. सततचा ताण मनात साठत गेल्यावर संवाद कमी होतो, गैरसमज वाढतात, आणि कधी कधी घरातील वातावरणही तणावपूर्ण बनतं. कामात लक्ष न लागणे, निर्णय घेण्यात अडचण येणे, आत्मविश्वास कमी होणे हे मोठे परिणाम आहेत. काही वेळा परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की व्यक्ती स्वतःलाच कमी लेखू लागते किंवा आयुष्याबद्दल नकारात्मक विचार करू लागते. मग महिलाच हा त्रास का लपवतात? यामागे अनेक सामाजिक आणि वैयक्तिक कारणं आहेत. आपल्या समाजात अजूनही 'महिलांनी सगळं सांभाळलं पाहिजे' अशी अपेक्षा ठेवली जाते. कुटुंब, मुलं, काम या सगळ्यांचा ताण घेताना स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या जातात. "मला खचून चालणार नाही", "लोक काय म्हणतील?", "घरच्यांना त्रास होईल" अशा विचारांमुळे त्या बोलणं टाळतात. काहींना तर स्वतःलाच आपल्या भावना ओळखता येत नाहीत.
याशिवाय मानसिक आरोग्याबाबत अजूनही जागरूकता कमी आहे. शरीराला त्रास झाला तर डॉक्टरकडे जाणं सहज वाटतं, मानसिक अस्वस्थता मान्य करणं अनेकांना कठीण जातं. त्यामुळे समस्या आतमध्येच वाढत राहते. यावर उपाय म्हणजे सर्वप्रथम भावना व्यक्त करणं. विश्वासू व्यक्तीशी बोलणं, स्वतःसाठी वेळ काढणं, गरज वाटल्यास समुपदेशक किंवा तज्ज्ञांची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं शारीरिक आरोग्य.
महिलांनी "सगळं मीच सहन करेन" ही भावना सोडून, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपण ठीक असलो, तरच आपल्या आसपासचं जगही व्यवस्थित सांभाळता येतं. ताण, चिंता किंवा डिप्रेशन लपवून ठेवण्यापेक्षा त्याला सामोरं जाणं हेच खऱ्या अर्थाने मजबूतपणाचं लक्षण आहे.
