Kitchen Tips : उन्हाळा सुरू होताच घराघरांमध्ये जबरदस्तीचे पाहुणे म्हणजे पाली, डास, झुरळांचा हैदोस सुरू होतो. इतकंच नाही तर सोंडे, कीटक, अळ्या घरातील डाळी, गहू, तांदळाच्या डब्यांमध्ये दिसू लागतात. सोंडे, कीटक पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. पण तरीही काही धान्यातील सोंडे कमी होत नाहीत. आपण कितीही चांगले डबे वापराल तरी जरासा ओलावा किंवा उष्णता मिळताच डाळींमध्ये सोंडे होतात आणि जाळेही दिसू लागतात. आपणही या समस्येने हैराण असाल तर चिंता सोडा. कारण मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी यावर एक जालीम उपाय सांगितला आहे.
एक चमचा मीठ करेल कमाल
साधारणपणे जास्तीत घरांमध्ये धान्यात सोंडे, कीटक किंवा अळ्या होऊ नये म्हणून तेज पत्ते, लवंग किंवा कापराचा वापर केला जातो. हे फार जुने आणि प्रभावी उपाय मानले जातात. पण प्रत्येक वेळी हे उपाय काम करतीलच असं नाही. अनेकदा यांचा वापर करूनही डाळींमध्ये सोंडे, कीटक होतात.
अशात मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी 'आजतक'शी बोलताना एक नवा खास उपाय सांगितलाय. त्या सांगतात की, डाळींमध्ये सोंडे होऊ नये म्हणून वेगळं काही विकत आणायची गरज नाही. ही समस्या दूर करण्यात एक चमचा मीठ कमाल करू शकता. जेव्हा आपण डब्यांमध्ये डाळी भराल तेव्हा त्यात एक चमचा मीठ चांगलं मिक्स करा.
पंकज सांगतात की, मिठाने डाळींमधील ओलावा अब्जॉर्ब केला जातो. त्यामुळे डाळींमध्ये सोंडे होण्याचा धोका दूर होतो. कीटक वाढण्यासाठी ओलावा असलेल्या जागा शोधत असतात, पण जेव्हा डाळी वाळलेल्या, कोरड्या असतील तर कीटक होणार नाहीत.
हा उपाय करण्याची सगळ्यात चांगली बाब म्हणजे मीठ सगळ्याच घरांमध्ये असतं आणि उपाय करणं देखील सोपा आहे. त्यासोबत डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला वेगळे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. फक्त काळजी घ्या की, डाळीमध्ये एक चमचा मीठ मिक्स केल्यानंतरही ती एअरटाईट डब्यांमध्येच ठेवा. तेव्हा हा उपाय अधिक प्रभावी ठरेल.
