सध्या उष्णता भयंकर वाढलेली आहे. त्याचा परिणाम अन्न पदार्थांवरही होतो. सकाळच्या स्वयंपाकात केलेले वरण, भाजी असे पदार्थ रात्रीपर्यंत खराब झालेले असतात. ऊन वाढल्याचा परिणाम गुळावरही होतोच. काही वेळेस गूळ पातळ, चिकट व्हायला लागतो. त्याला तारा सुटायला लागतात. तर कधी कधी त्याला पांढरट बुरशी येऊन आंबूस वास यायला लागतो. हे सगळं टाळायचं असेल तर उन्हाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये गूळ साठवून ठेवताना थोडी काळजी घ्यायला हवी. त्यामुळे अगदी ५- ६ महिने गूळ चांगला राहील. अजिबात खराब होणार नाही.(How to Keep Jaggery Fresh in Summer?)
गुळाला पाणी सुटून तो चिकट होऊ नये म्हणून काय करावं?
१. या दिवसांत गूळ साठविण्यासाठी काचेच्या किंवा एअर टाईट बरण्यांचा वापर करा. या बरण्यांमध्ये साठवलेला गूळ अधिककाळ चांगला राहातो.
‘न्यासाशी रोज व्हायचं भांडण, ३ वर्षे डोक्याला ताप!’- काजोल सांगते घरातलं वादळ कसं शांत झालं..
२. रोजच्या स्वयंपाकात लागणारा गूळ एका छोट्या डब्यात काढून ठेवावा. जेणेकरून स्वयंपाक करताना ओलसर हात लागून गूळ खराब आणि चिकट होत नाही.
३. गूळ जर टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून मग एअर टाईट डब्यात ठेवला तर त्याला पाणी सुटत नाही. पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळलेला गूळ तुम्ही स्टीलच्या डब्यातही ठेवू शकता.
४. गूळाचा डबा अशा ठिकाणी ठेवा जिथली जागा जास्त गरम होत नाही. किंवा त्या ठिकाणी थेट ऊन पडत नाही. काही वेळा अगदी गॅस शेगडीच्या वरच्या किंवा बाजुच्याच कप्प्यांमध्ये गूळ ठेवलेला दिसतो. उष्णतेमुळे त्या गुळाला लवकर पाणी सुटून तो खराब होतो.
५. गुळाचे लहान लहान तुकडे करून तो डब्यात भरून फ्रिजमध्येही ठेवू शकता. अशा पद्धतीने ठेवलेला गूळ महिनोंमहिने अगदी फ्रेश राहातो.
