"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:50 IST2024-11-15T14:47:38+5:302024-11-15T14:50:32+5:30
"मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कुणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, दुमच्यावर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल," असे आदित्य ठाकरे म्हणाले होता...

"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, राजकीय नेते एकमेकांवर जहरी टीका आणि आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, दापोलीतील प्रचारसभेतून, "गल्लीतले गुंड असतात, त्यांना वाटतं आपणच डॉन. मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कुणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, दुमच्यावर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल," असे आदित्य ठाकरे म्हणाले होता. यावर कदमांनीही पलटवार केला आहे. "तुम्ही लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा. नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले, तेव्हा ते गाडीवरती पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हते." असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
कदम म्हणाले, "योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्यांना समजत होते. त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची हाकलपट्टी केली. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्यांना उचलून बाजूला ठेवले. गद्दारी तुम्ही केलीत. योगेश कदमांच्या पाठीत खंजेस खुपसण्यांच काम तुम्ही केलं."
"आदित्य तुम्ही मला काका काका म्हणत होतात ना? मग तुमचे वडील मुख्यमंत्री झाले आणि काकाला बाहेर ठेवले. काकाचे मंत्रीपद तुम्ही घेतले. मग तेव्हा रामदास कदम सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला काहीच वाटले नाही का? गद्दार कोण? गद्दार तुम्हीच आहात?" असे कदम म्हणाले.
"तुम्ही लादीवर झोपवायचे म्हणून सांगताय, तुमच्या वडिलांना विचारा. नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुमचे वडील गाडीवरती पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हते. त्यांना विचारून घ्या आणि मग लादीवर झोपवायच्या गप्पा मारा. मी गृहराज्यमंत्री होतो, पोलीस खातं मी चालवलंय, मला माहित आहे कुणाला लादीवर झोपायचे, कुणाला कसे फटके द्यायचे? तुम्हाला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत." असा टोलाही कदमांनी आदित्य ठाकरेंना लगावला.