रत्नागिरी सिंधुदुर्गात उतरवले १२ हजार फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:49 PM2024-03-20T15:49:47+5:302024-03-20T15:50:06+5:30
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणा सरसावली असून, शासकीय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवरील १२ हजार ५४४ फलक आणि इतर साहित्य उतरवण्याची, झाकण्याची कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समिती समन्वयक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय कार्यक्रमांचे, प्रचारांचे बॅनर्स झळकत होते. अनेक ठिकाणी भिंती रंगवण्यात आल्या आहेत. विकास कामांचे फालक लावण्यात आले आहेत. यातील शक्य तितके बॅनर्स उतरवण्यात आले असून, उर्वरित बॅनर्स झाकून ठेवण्यात आले आहेत.
याखेरीज कणकवली येथे स्थायी निगराणी पथकाने (एसएसटी) ने १० लाखांची रोकड जप्त केली. तर, सावंतवाडी येथे ४ लाख २२ हजार ४५० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अशा गोष्टींवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे, असे कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले.