"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:30 IST2026-04-07T12:13:16+5:302026-04-07T12:30:17+5:30
पार्थ पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना ते त्यांच्या पक्षाचे मत असल्याचे म्हटलं.

"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
Supriya Sule On Parth Pawar: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या डाऊनफॉलच्या टीकेनंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही या वादात मोजक्या शब्दांत सूचक प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार या पोटनिवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याने या जागेवर आता लढत होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर संताप व्यक्त करताना पार्थ पवार म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे, त्यामुळेच ते अशा प्रकारे वागत आहेत."
काँग्रेसचे 'जशास तसे' उत्तर
पार्थ पवारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये, ज्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी विचारधारेची तडजोड केली, त्यांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलू नये," अशा शब्दात पार्थ पवारांवर टीका केली.
लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार - सुप्रिया सुळे
या संपूर्ण वादावर जेव्हा सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. सुळे म्हणाल्या की, "आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोकं आहोत. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत काम करत आहे. आम्ही काँग्रेस पक्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मी काँग्रेसच्या मतांवरही निवडून आले आहे. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय ही काँग्रेस पक्षाची देन आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे आहे ते नाकारुन चालणार नाही. पण लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे लोक त्यांची मते मांडत असतात," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी हे त्यांच्या पक्षाचे मत असेल असेही म्हटलं. "हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला पाहिजे कारण त्यांच्या एका खासदाराचे ते मत आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे ते मत असेल. त्यांचे काय मत आहे यावर मी बोलण्यापेक्षा त्यांच्या गटाला विचारायला हवं," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
"सल्ला चॅनेलवर नाही, घरात द्यावा" - सुप्रिया सुळे
पार्थ यांच्या विधानावर बोलताना शरद पवार यांनी राजकारणात परिपक्वता असायला हवं असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारले असता, "शरद पवार सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. आपल्यापेक्षा मोठी असलेली व्यक्ती एकदा बोलल्यानंतर त्याच्यावर बोलायचं नाही या संस्कारात मी वाढलेली आहे. कौटुंबिक सल्ला चॅनेलवर नाही तर घरात दिला जातो," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.